काश्मीर: भारताविरुद्ध पाकिस्तानच्या कारवाया कायमच सुरु असतात. याचाच आणखी एक मोठा पुरावा आज सापडला आहे. बीएसएफनं आंतरराष्ट्रीय सीमेवरील सांबा सेक्टर येथे एक भुयार शोधून काढलं आहे. हे भुयार पाकिस्ताकडून भारताच्या दिशेनं खोदण्यात आलं होतं. या भुयारातून दहशतवादी घुसखोरी करण्याचा तयारीत होते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.


बीएसएफकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 'भुयार अद्याप पूर्णपणे खोदण्यात आलेलं नव्हतं. सध्या या भुयाराबाबत बीएसएफ आणखी चौकशी करत आहे. हे प्रकरण बीएसएफनं गांभीर्यांनं घेतलं असून याची सखोल चौकशी करण्यात येईल.'

ज्या परिसरात हे भुयार सापडलं तो भाग हा भारत-पाक आंतरराष्ट्रीय सीमेच्याजवळील आहे. येथूनच अनेकदा पाकिस्तानमधून घुसखोरीचा प्रयत्न केला जातो. दरम्यान, आज उत्तर काश्मीरमधील बांदीपुरामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलात झालेल्या गोळीबारात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं. तर सुरक्षा दलातील तीन जवान शहीद झाले.

सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानकडून वारंवार भारताच्या कुरापती काढणं सुरुच आहे. अनेकदा सीमेवरुन दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, भारतीय लष्करही या घुसखोरांना चोख प्रत्युत्तर देत आहे.