बंगळुरु : 'स्वच्छ भारत' अभियानाचा लोगो असलेली लग्नाची पत्रिका एका तरुणाने आपल्या बहिणीसाठी छापली. विशेष म्हणजे या पत्रिकेचा फोटो ट्वीट करुन या तरुणाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच लग्नाचं निमंत्रण धाडलं आहे.


पंतप्रधानांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या 'स्वच्छ भारत' अभियानाचा लोगो म्हणजेच महात्मा गांधींचा चष्मा बंगळुरुतील आकाश जैनने आपल्या बहिणीच्या लग्नाच्या पत्रिकेवर छापला आहे. पत्रिकेचा फोटो ट्वीट करत 'स्वच्छ भारतचा लोगो माझ्या बहिणीच्या लग्नपत्रिकेवर असावा, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती.' असं कॅप्शन फोटोला दिलं आहे.

https://twitter.com/akash207/status/848194672937893892
आकाशचं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिट्वीट तर केलं आहेच, मात्र आश्चर्याचा धक्का देत आकाशला ट्विटरवर फॉलो करण्यासही सुरुवात केली. पंतप्रधानांच्या या कृत्यामुळे आनंदलेल्या आकाशने स्क्रीनशॉट पोस्ट करत मोदींचे आभार मानले. मोदीजी हे कायमच माझ्या वडिलांचे प्रेरणास्रोत होते, असं त्याने दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

https://twitter.com/akash207/status/848612217725628416
2 ऑक्टोबर 2014 ला म्हणजेच महात्मा गांधींच्या स्मृतिदिनी पंतप्रधानांनी 'स्वच्छ भारत मिशन'ला सुरुवात केली. गांधीजींच्या 150 व्या जयंतीला म्हणजेच 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत स्वच्छ भारत करुन महात्मा गांधींना आदरांजली देण्याचा मोदींचा मानस आहे.