भोपाळमध्ये गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, बोट उलटून 11 जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 13 Sep 2019 08:43 AM (IST)
खटलापुरा घाटावर आज पहाटे साडेचारच्या सुमारास ही बोट उलटली. गणपती विसर्जनासाठी वापरलेली बोट अतिशय लहान होती.

भोपाळ : मध्य प्रदेशात गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली. राजधानी भोपाळमध्ये विसर्जनासाठी गेलेली बोट उलटली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून चार जण बेपत्ता लोकांना वाचवण्यात आलं आहे. खटलापुरा घाटावर आज पहाटे साडेचारच्या सुमारास ही बोट उलटली. गणपती विसर्जनासाठी वापरलेली बोट अतिशय लहान होती. मूर्ती विसर्जनासाठी पाण्यात उतरताच बोट एकीकडी झुकली आणि उलटली. यावेळी बोटीतील भाविक मूर्तीच्या खाली अडकले. आतापर्यंत 11 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातातील बेपत्ता लोकांना वाचवण्यासाठी एसडीआरएफच्या पथकाची मदत घेण्यात येत आहे. एसडीआरएफच्या पथकाने पाच जणांना वाचवलं आहे. दुर्घटनेतील मृत भाविक हे पिपलानीच्या 1100 क्वॉर्टरचे रहिवासी होते. दरम्यान, अपघाताची चौकशी करणार असल्याची माहिती मध्य प्रदेशचे जनसंपर्क मंत्री पीसी शर्मा यांनी दिली. तसंच मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाईल, असंही त्यांनी सांगितलं.