BJP National Executive Meeting:  भाजपाच्या (BJP) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक (National Executive Meeting) यावेळी हैदराबादमध्ये (Hyderabad) होत आहे. हैदराबादच्या नोव्हाटेल कॉन्वेंशन सेंटरमध्ये या बौठकीचं आयोजन करण्यात आले आहे. शनिवार आणि रविवार अशी दोन दिवस भाजप कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बौठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपचे 19 मुख्यमंत्री सहभागी होणार आहे. हैदराबादमध्ये कार्यकारणीची बैठक घेत भाजप दक्षिणेत पाय रोवण्याचा प्रयत्न करणार आहे. पुढील वर्षी तेलंगणामध्ये निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची मानली जात आहे. बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहेत.


तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) आणि AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या गडामध्ये घुसण्याचा हा भाजपा प्रयत्न असणार आहे. दोन दिवसांच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हैदराबादमध्ये दाखल झाले आहेत. त्याशिवाय गृह मंत्री अमित शाह, योगी आदित्यनाथ आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित आहेत. भाजपशासित राज्यातील 19 मुख्यमंत्र्यांसह अनेक केंद्रीय मंत्रीही या बैठकीला हजर राहणार असल्याचं समजतेय. 


 भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार, या कार्यकारणी बैठकीचा मुख्य उद्धेश पक्षाचा विस्तार करणे असू शकतो. तेलंगणामधील भाजपचे प्रवक्ता एन.वी. सुभाष म्हणाले की, 18 वर्षानंतर हैदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक होत आहे.  दरम्यान, या अगोदर 2004 मध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक हैदराबादमध्ये झाली होती.  पुढच्या वर्षी तेलंगणा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी भाजपाने आपली कंबर कसली आहे. ‘मिशन दक्षिण’ अजेंड्याखाली भाजपा दक्षिण भागातील अधिकाधिक मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करणार आहे.


रविवारी पंतप्रधान आंध्रप्रदेशातील भीमावरमला भेट देणार -
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाचा भाग म्हणून, स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची न्याय्य दखल घेऊन त्यांच्याबद्दल देशभरातील लोकांना जागृत करण्याबद्दल कटीबद्ध आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी भीमावरम येथे प्रख्यात स्वातंत्र्यसैनिक आलुरी सीताराम राजू यांच्या वर्षभर चालणाऱ्या 125 व्या जयंती सोहळ्याचे उद्घाटन करतील. पंतप्रधान आलुरी सीताराम राजू यांच्या 30 फुटी कांस्यपुतळ्याचे अनावरणही करतील. 4 जुलै 1897 रोजी जन्मलेले अलुरी सीतारामा राजू यांचे स्मरण पूर्व घाटांतील आदिवासी जमातीच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ब्रिटिशांविरोधात दिलेल्या लढ्यासाठी केले जाते. 1922 मध्ये सुरू करण्यात आलेल्या राम्पा बंडांचे नेतृत्वही त्यांनी केले होते. त्यांचा उल्लेख स्थानिकांकडून मन्यम वीराडु (जंगलांचा नायक) म्हणून केला जातो.