BJP Foundation Day 2023:  आज भारतीय जनता पार्टी (Bharatiya Janata Party) 44वा स्थापना दिवस साजरा करत आहे. यानिमित्तानं पक्षाच्या वतीनं देशभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. 1980 मध्ये आजच्याच दिवशी भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना करण्यात आली होती. 1980 मध्ये जनसंघातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या नेतृत्वाखाली भाजपची स्थापना केली होती. स्थापनेनंतर भाजपचे पहिले लक्ष गुजरात, राजस्थान आणि संयुक्त मध्य प्रदेश याच राज्यांवर होतं. केवळ तीन राज्यांपुरता मर्यादित असणारा पक्ष आज बघता बघता केवळ देशच नाहीतर संपूर्ण जगभरातील मोठा पक्ष म्हणून ओळखला जातोय. 


सध्या 12 राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे. लोकसभेत पक्षाच्या 303 जागा आहेत, तर राज्यसभेतही सुमारे 100 खासदार भाजपचे आहेत. कार्यकर्त्यांच्या संख्येच्या बाबतीत भाजप हा जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातोय. पाहुयात, सुरुवातीला मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात या तीन राज्यांपुरताच मर्यादित असणारा पक्ष 33 वर्षांत संपूर्ण देशभरात कसा पोहोचला... 


6 एप्रिल 1980 रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली जनसंघातून बाहेर पडलेल्या लोकांनी भाजपची स्थापना केली. अटलबिहारी वाजपेयी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी स्थापन केलेल्या भाजपला 1984 मध्ये केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर 1996 मध्ये पहिल्यांदा केंद्रात 13 दिवस अटलबिहारी वाजपेयी यांचं सरकार स्थापन झालं. मात्र, बहुमताअभावी त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी पक्ष वाढवत 1998 मध्ये 182 जागांवर भाजपला विजय मिळवून दिला. भाजपनं 2014 मध्ये 282 जागा जिंकल्या आणि 2019 मध्ये त्यांच्या जागांची संख्या 300 च्या पुढे गेली. सध्या केवळ देशातीलच नाहीतर संपूर्ण जगभरातील मोठ्या पक्षांच्या यादीत भाजपचा प्रामुख्यानं समावेश केला जातो. 


कशी झाली भाजपची स्थापना? 


1980 मध्ये या दिवशी भारतीय जनता पक्षाची सुरुवात झाली होती. भारतीय जनता पक्षाचं पूर्वीचं नाव जनसंघ होतं, जे 1977 मध्ये जनता पक्षात विलीन झालं. 1980 मध्ये जनसंघातून बाहेर पडलेल्या नेत्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपची स्थापना केली होती. स्थापनेनंतर भाजपचे पहिले लक्ष गुजरात, राजस्थान आणि संयुक्त मध्य प्रदेश याच राज्यांवर होतं. 


केवळ 3 मतांमुळे बहुमताच्या सरकारमधून वाजपेयी आणि अडवाणी यांना बाहेर काढण्यात आले होते. त्याच्या दोन दिवसानंतर भाजपची स्थापना झाली. अडवाणींनी भाजपची स्थापना कशी झाली ते सांगितलं होतं... 


1980 च्या लोकसभा निवडणुकीत जनता पक्षातील संघविरोधी मोहिमेनं कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला होता. याचा काँग्रेसला स्पष्टपणे फायदा झाला आणि निवडणुकीत जनता पक्षाची कामगिरी खालावण्याचा प्रयत्न झाला. एप्रिलमध्ये नवी दिल्लीत जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत दुहेरी सदस्यत्वाबाबत अंतिम निर्णय होणार होता. परंतु जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने 17 ने तडजोडीचा फॉर्म्युला फेटाळून लावला. 14 च्या बाजूने मतदान झाले आणि माजी जनसंघ सदस्यांची हकालपट्टी करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. 


अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि जनसंघाच्या इतर नेत्यांनी 6 एप्रिल 1980 रोजी दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर 'भारतीय जनता पार्टी' या नावानं नवीन राजकीय पक्षाची घोषणा केली. अटलबिहारी वाजपेयी भाजपचे पहिले अध्यक्ष झाले. 


भाजपचं निवडणूक चिन्ह कमळ


जनसंघाचे निवडणूक चिन्ह 'दीपक' तर भाजपचे निवडणूक चिन्ह 'कमळ' असं ठेवण्यात आलं होतं. भाजपच्या संस्थापकांनी 'कमळ' हे निवडणूक चिन्ह बनवलं कारण हे चिन्ह क्रांतिकारकांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध वापरलं होतं. यातून भारतीयत्व दिसून येतं. कमळाच्या फुलाला हिंदू परंपरेशी जोडूनही पाहिलं जातं. कमळ हे राष्ट्रीय फूल देखील आहे. अशाप्रकारे कमळाचं फुल हे निवडणूक चिन्ह बनवून भाजपनं हिंदुत्व आणि राष्ट्रवाद या दोन्ही मुद्द्यांची कास धरली.