नवी दिल्ली : सर्वच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन विविध उपक्रम राबवत आहेत. त्यात सत्ताधारी भाजपही मागे नाही. भाजपचे नेते अनुसूचित जातींमधील लोकांच्या घरुन आणलेल्या तीन हजार किलो तांदळाची आणि डाळीची खिचडी शिजवणार आहेत. यासाठी तीन लाख अनुसूचित जातींमधील लोकांच्या घरुन तांदूळ आणि डाळ आणली आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर या तांदळाची खिचडी शिजवली जाणार आहे.


भाजपने या उपक्रमाला ‘भीम महासंगम रॅली’ असे नाव दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 11.30 वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे. या रॅलीद्वारे भाजप एकाच वेळी सर्वात जास्त खिचडी शिजवण्याचा विश्वविक्रम करणार आहे. सध्या 918 किलो तांदळाच्या खिचडीचा रेकॉर्ड प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या नावावर आहे. भाजप आता हा रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे.

या रॅलीला दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी, महासचिव रामलाल, थावरचंद गहलोतसह अन्य नेते सहभागी होणार आहेत. नागपूरमधील शेफ विष्णू मनोहर आणि त्यांची टीम या समरसता रॅलीत सहभागी होणार आहेत. त्यांची टीम खिचडी शिजवण्याचे काम करणार आहे. या रॅलीत 50 हजार लोक सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या खिचडीसाठी खास भांडे तयार करण्यात आले आहे. 20 फूट व्यास, सहा फूट खोली असलेल्या या भांड्यात तीन हजार किलो तांदूळ आणि डाळीची खिचडी तयार केली जाणार आहे.