Congress Bharat Jodo Yatra : गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरु असणाऱ्या काँग्रेसच्या (congress) 'भारत जोडो यात्रे'ला (Bharat Jodo Yatra) आजपासून सुरुवात होणार आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वाखाली ही यात्रा होणार आहे. आज (7 सप्टेंबर)  कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रा सुरू होणार आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ पहिली प्रार्थना सभा होणार आहे. यात्रा सुरु होण्यापूर्वी राहुल गांधी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल, तिरुवल्लुवर पुतळा आणि कामराज मेमोरियललाही भेट देणार आहेत. दरम्यान, ही यात्रा 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे. दररोज 21 किमी चालल्यानंतर, 150 दिवसांत 3 हजार 570 किमी अंतर कापून ही काश्मीरमध्ये पोहोचणार आहे. 


भारत जोडो यात्रेचा संपूर्ण प्रवास हा राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली होणार असला तरी विविध ठिकाणाहून नागरिक या यात्रेत सहभागी होणार आहेत. दरम्यान, आज कन्याकुमारी येथील 'गांधी मंडपम' येथील कार्यक्रमादरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन देखील उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांसह सार्वजनिक रॅलीच्या ठिकाणी भेट देतील. तिथून यात्रेची सुरुवात होईल. कन्याकुमारी ते श्रीनगर असा 3 हजार 570 किमी लांबीच्या प्रवासाची औपचारिक सुरुवात रॅलीतून होईल. पदयात्रा 11 सप्टेंबर रोजी केरळला पोहोचणार आहे.


कसा असेल आजचा कार्यक्रम
 
राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक नेते 8 सप्टेंबरला सकाळी 7 वाजता पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
सकाळी 7 वाजता राहुल गांधी श्रीपेरंबदुर येथील राजीव गांधी स्मारकाला भेट देतील.
राजीव गांधी यांची हत्या झालेल्या श्रीपेरंबदूरला राहुल गांधी पहिल्यांदाच भेट देत आहेत.
दुपारी 3 वाजून 5 मिनीटांनी तिरुवल्लुवर स्मारकाला भेट देणार 
दुपारी 3.25 वाजता विवेकानंद स्मारकाला भेट देतील
दुपारी 3.50 वाजता कामराज स्मारकाला भेट देतील
कन्याकुमारी येथील गांधी मंडपम येथे सायंकाळी 4.10 वाजता सर्वधर्मीय प्रार्थना सभा होणार आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन सायंकाळी 4.30 वाजता गांधी मंडपममध्ये राहुल गांधींना तिरंगा सुपूर्द करतील.
4.40 वाजता सर्व नेते गांधी मंडपापासून काही अंतरावर असलेल्या सभेच्या ठिकाणी चालत जातील.
सायंकाळी 5 वाजता जाहीर सभेत भारत जोडो यात्रेचा शुभारंभ होणार आहे.


काँग्रेसची  भारत जोडो यात्रा म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरुद्ध वातावरण निर्माण करण्याची तयारी असल्याचं बोललं जात आहे. या यात्रेनिमित्त काँग्रेस पक्ष पुन्हा मजबूत करणे आणि देशभरात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा भरणे, तसेच पक्षात आणखी तरुण कार्यकर्त्यांचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या: