Belgaum Municipal Corporation Election : बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज (सोमवारी) सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांनी प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. भाजप, काँग्रेस बरोबर आप, एमआयएम, निधर्मी जनता दल देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी बीके मॉडेल हायस्कूल येथे सोमवारी होणार असून सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.


बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी (Belgaum Municipal Corporation Election) एकूण 58 प्रभागांची मतमोजणी होणार आहे. एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजप 55, काँग्रेस 45, महाराष्ट्र एकीकरण समिती 21, जेडीएस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 उमेदवारांचे भवितव्य सोमवारी ठरणार आहे. मतमोजणी केंद्रात पाचशे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राच्या परिसरात 144 कलम जारी करण्यात आले आहे. शहरात मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात 1500 पोलीस बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राकडे जाणारे सगळे रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत. दुपारी बारा वाजेपर्यंत सगळे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. अनेक माजी महापौर, उप महापौर निवडणुकीपासून अलिप्त राहिले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात बहुतांश चेहरे नवीन आहेत.


गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बेळगाव महानगरपालिका निवडणुकांसाठी 3 सप्टेंबर रोजी मतदान पार पडलं असून आज, 6 सप्टेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची तयारी सुरु केली होती. बेळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान पार पडलं. 


बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी बी के मॉडेल हायस्कूल येथे सोमवारी होणार असून सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. बीके मॉडेल हायस्कूलमध्ये स्ट्राँग रुममध्ये मतदान यंत्रे ठेवण्यात आली आहेत. मतमोजणी केंद्रावर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. हायस्कूलच्या आवारात कोणालाही जाण्यास परवानगी नाही. निवडणुकीच्या रिंगणात एकूण 385 उमेदवार असून त्यांचे भवितव्य सोमवारी ठरणार आहे. राष्ट्रीय पक्षांनी प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. मतदान केवळ पन्नास टक्के झाल्यामुळं राष्ट्रीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना निकाल काय लागणार? याची धाकधूक लागली आहे. मतदान यादीतून दहा हजार मतदारांची नावं गायब झाल्यामुळे अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही. राष्ट्रीय पक्षांनी प्रथमच पक्षाच्या चिन्हावर लढविलेली निवडणूक, आप, एमआयएम पक्षांनी निवडणुकीच्या रिंगणात केलेली एंट्री, भाजप मधील नाराजांची समजूत काढण्यात भाजप नेत्यांना आलेले अपयश,अनेक प्रभागात एकाहून अधिक निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकलेले मराठी भाषिक उमेदवार ही यावेळच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची वैशिष्ठ्ये म्हणावी लागतील. 


राष्ट्रीय पक्षांचीही प्रतिष्ठा पणाला 


बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष प्रथमच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. भाजप आणि काँग्रेस पक्षानं सगळ्या प्रभागात आपले उमेदवार उभे केले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीनं देखील बहुसंख्य वार्डात आपले उमेदवार उभे केले आहेत. एकाहून अधिक मराठी उमेदवार असतील, तर तिथे समन्वयानं एकच मराठी उमेदवार उभा करण्याच्या प्रयत्नाला यश मिळत आहे. भाजपमध्ये तिकीट देताना निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे भाजपला नाराजीचा फटका बसणार आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यामुळं अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असणाऱ्या सात कार्यकर्त्यांची भाजप मधून निवडणुकीच्या तोंडावर हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे कर्नाटक प्रदेश अध्यक्ष नालिनकुमार कटील, मंत्री इश्र्वराप्पा,मंत्री गोविंद करजोळ यांनी देखील बेळगावात प्रचारात भाग घेतला. काँग्रेस पक्षाचे देखील राज्य पातळीवरील नेते प्रचारात सहभागी होत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते घरोघरी जावून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. एमआयएम पक्षानं देखील महानगरपालिका निवडणुकीत आपलं नशीब आजमावून पाहायचं ठरवलं असून सहा प्रभागात त्यांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. अकबरुद्दीन ओवेसी यांनी देखील बेळगावला भेट देऊन आपल्या उमेदवारांचा प्रचार केला आहे.


महानगरपालिकेच्या समोर लावण्यात आलेला बेकायदेशीर लाल पिवळा झेंडा, शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास करण्यात आलेला विरोध,कन्नड मधून कागदपत्रे देणे, मराठी भाषिकांची गळचेपी करणे, कन्नड फलक लावण्याची सक्ती करणे आदी मुद्दे महाराष्ट्र एकीकरण समितिच्या उमेदवारांनी प्रचारात अधोरेखित केले आहेत. राष्ट्रीय पक्षाने विकासाचे गाजर आपल्या जाहीरनाम्यातून मतदारांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी अस्मितेचा,संस्कृतीचा महाराष्ट्र एकीकरण समितिचा मुद्दा, राष्ट्रीय पक्षाकडून दाखवली जाणारी प्रलोभने या बरोबरच अन्य अनेक विषय यावेळच्या महानगरपालिका निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत.


दरम्यान, राज्यातील प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्ष आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे महापालिकेसह जिल्हा प्रशासनाकडून मतदानासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.