मुंबई : रविवारच्या सुट्टीनंतर आज बँका पुन्हा उघडणार आहेत. त्यामुळे सर्वच बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी आणि बदलून घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. काल देशभरातल्या बँका बंद असल्यानं सर्वच ग्राहकांची भिस्त एटीएमवर होती.


बऱ्याच ठिकाणी एटीएम अद्यापही बंद असल्याने ग्राहकांचे हाल पहायला मिळाली. त्यामुळे सुट्टीचा दिवसही लोकांना एटीएमबाहेरच काढावा लागला. राज्याभरातल्या अनेक शहरांमध्ये कमी अधीक प्रमाणात हीच परिस्थिती आहे.

काळ्या पैशाविरोधातील लढाईला बळ मिळावं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आणि जमा करण्यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दी होऊ लागली. अचानक जाहीर झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशभरातील अनेकांचे दैनंदिन व्यवहार कोलमडले.