अयोध्या : शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यासाठी एक 'बाळासाहेब प्रेमी' शिवसैनिक मोटारसायकलने प्रवास करत अयोध्येत दाखल झाला आहे. जिथे-जिथे बाळासाहेबांची सभा होत असे, तिथे-तिथे मोहन यादव उपस्थित राहत असत.


एका अपघातात पायाला जबर दुखापत झाल्यानंतरही निर्धारात गेल्या पंचवीस वर्षांपासून त्यांनी खंड पडू दिला नाही. आता आयोध्या दौऱ्यासाठीही गेल्या दहा दिवसांपासून बाईकने प्रवास करत ते अयोध्येत पोहोचले.

मोहन यादव यांच्या मुलांनाही राज आणि उद्धव ठाकरे याच नावाने ओळखलं जातं. पण प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्त्यांची जी अवस्था असते तीच मोहन यादव यांचीही आहे. कारण त्यांच्या वाट्याला आजवर पक्षाकडून केवळ उपेक्षाच आली.

मोहन यादव हे पुणे महापालिकेत वॉचमन म्हणून काम करत होते. पण शिवसेनेचे काम करतो म्हणून आपल्याला आणि आपल्या मुलाला कामावरुन काढून टाकल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यानंतर छोटी-मोठी कामे करुन ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

मोहन यादव यांची बाईकही भगव्या रंगाची आहे. त्यावर केशरी रंगाची फुलं लावल्याने अधिक उठाव आला आहे. बाईकवरही त्यांनी विविध घोषणा लिहिल्या आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 25 आणि 26 नोव्हेंबरला 'चलो अयोध्या' हा नारा दिला आहे. राम मंदिराच्या उभारणीला चालना देण्यासाठी त्यांनी हा दौरा हाती घेतला आहे. त्यासाठी ते शिवनेरी किल्ल्यावरील माती भरलेला कलश घेऊन जात आहेत.

विशेष म्हणजे, या दौऱ्यासाठी मोहन यादव स्वतः वीस हजार रुपयांची पदरमोड करुन अयोध्येत पोहचले. त्यामुळे त्यांच्या या निष्ठेची, पक्षप्रेमाची परतफेड किमान त्यांचा हरवलेला रोजगार परत मिळवून देऊन पक्ष करणार का हे बघायला हवे.