नवी दिल्ली : योगगुरु बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीवर केलेलं वादग्रस्त वक्तव्य मागे घेतलं आहे. योगगुरु रामदेव यांनी कोरोना मृत्यूंमागे अ‍ॅलोपॅथी कारण असल्याचं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यानंतर डॉक्टर्स आणि संघटनांकडून संताप व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर बाबा रामदेव यांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी पत्र लिहित रामदेव बाबांना वक्तव्य पूर्णपणे मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. 


बाबा रामदेव यांनी आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांना एक पत्र लिहिलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, 'डॉ. हर्ष वर्धन जी आपलं पत्र मिळालं. त्यासंदर्भाने चिकित्सा पद्धतीवरील संघर्षाच्या या पू्र्ण वादाला मी विराम देत आहे. मी माझं वक्तव्य मागे घेत आहे.  आम्ही अॅलोपॅथीचे तथा आधुनिक उपचार पद्धतीचे विरोधक नाही. आम्ही हे मान्य करतो की जीव वाचवण्यासाठी आधुनिक अॅलोपॅथीनं खूप प्रगती केली आहे आणि मानव सेवा केली आहे. माझं जे वक्तव्य कोट केलं आहे ते मी कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्हॉट्सअॅपवरील आलेला मेसेज वाचून दाखवलेलं आहे. यामुळं कुण्याच्या भावना दुखावल्या असतील तर मला खेद आहे, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. 







बाबा रामदेव यांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांचं पत्र
बाबा रामदेव यांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी रामदेव बाबांना त्यांचं वक्तव्य पूर्णपणे मागे घ्या.  तुमच्या स्पष्टीकरणातून पूर्ण समाधान होत नाही.  तुम्ही हे आपत्तीजनक वक्तव्य पूर्णपणे मागे घ्याल ही आशा आहे. कोरोना काळात डॉक्टरांबाबत असं वक्तव्य करणं दुर्देवी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. देवी, पोलिओ, इबोला, टीबी या सारख्या गंभीर आजारांवर अ‍ॅलोपॅथीक पद्धतीनेच मात झाल्याची आठवण देखील हर्ष वर्धन यांनी रामदेव बाबांना करुन दिली होती.. 


मंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलं होतं की, आपल्या वक्तव्यामुळे देशवासीय खूप दु:खी झाले आहेत. कोरोनाविरोधात दिवसरात्र काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी देवदूत आहेत. अशा वेळेत आपण कोरोना योद्ध्यांचा अपमान केल्यानं खूप दु:ख झालं आहे. आपण जे स्पष्टीकरण दिलं आहे त्याने वेदना शमणार नाहीत, असं आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटलं. 


लाखो करोना रुग्णांचा मृत्यू अ‍ॅलोपॅथी औषधं घेतल्याने झाल्याचं आपलं वक्तव्य चुकीचं आहे. आपल्याला कोरोनाविरुद्धची लढाई एकत्रितपणे लढायची आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात टाकून रुग्णांची सेवा करत आहेत. ते दिवसरात्र एक करून रुग्णांची सेवा करत आहेत, असं डॉ हर्ष वर्धन यांनी म्हटलं होतं.