नवी दिल्ली : बाबा हरदेव सिंह यांचं अपघाती निधन झाल्यानंतर आता त्यांची पत्नी सविंदर या निरंकारी संप्रदायाच्या प्रमुख बनणार आहेत. 1929 मध्ये स्थापन झालेल्या निरंकारी पंथाच्या 87 वर्षांच्या इतिहासात माता सविंदर या पहिल्या महिला प्रमुख ठरल्या आहेत. यापूर्वी बाबा हरदेव यांची कन्या सुदीक्षा त्यांचा वारसा चालवण्याची शक्यता असल्याचं वृत्त होतं. निरंकारी समुदायाच्या प्रमुखपदी सुदीक्षा यांची निवड होणार असल्याची चर्चा होती.
सुदीक्षा यांचे पती अवनीत सोतिया यांचाही हरदेव सिंह यांच्यासोबत कार अपघातात मृत्यू झाला. सुदीक्षा यांचं 11 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. निरंकारी समुदायाचे प्रमुख बाबा हरदेव सिंह यांच्यावर आज दिल्लीच्या निगमबोध घाटात अंत्यसंस्कार केले जातील.
कॅनडाच्या मॉन्ट्रियल शहरात एका कार्यक्रमासाठी जाताना 13 मे रोजी हरदेव सिंह यांच्या कारचा अपघात झाला होता. देशासह जगभरात निरंकारी पंथाची महती पोहोचवण्यात बाबा हरदेव सिंह यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. बाबा हरदेव सिंह यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1954 रोजी त्यांचा दिल्लीत त्यांचा जन्म झाला. हरदेव सिंह यांच्या वडिलांच्या हत्येनंतर 1980 मध्ये हरदेव सिंह निरंकारी संप्रदायाचे सर्वेसर्वा झाले. निरंकारी संप्रदायाच्या 27 देशांमध्ये 100 शाखा आहेत.