श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या सोनमर्गमध्ये झालेल्या हिमस्खलनाबाबत नवी माहिती हाती येत आहे. हिमस्खलनात मृत्यू झालेल्या पाच जणांमध्ये एका लष्करी अधिकाऱ्यासह चार स्थानिकांचा समावेश आहे. सोनमर्गमधील आर्मी कॅम्पजवळ हे हिमस्खलन झाल्याचं सांगण्यात येत होतं,


दुसरीकडे काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ गुरेज सेक्टरमध्येही हिमस्खलन झालं. इथे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

या परिसरात गेल्या काही दिवसांपासून तुफान बर्फवृष्टी सुरु आहे. सोनमर्गच्या या भागात नेहमीच हिमस्खलन होत असतं. सोनमर्गमध्ये होणाऱ्या हिमस्खलनाचा फटका अनेकदा भारतीय सैन्याला बसला आहे.

आर्मी कॅम्पवरील हिमस्खलनामुळे अनेकजण बर्फाखाली दबल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र बर्फाखाली दबलेल्या 8 जवानांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे.

जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये या मोसमातील ही चौथी हिमवृष्टी आहे. काश्मीरमध्ये कालपासून सुरु झालेल्या हिमवृष्टीमुळे प्रशासनानं उंच ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना हिमस्खलनाचा इशारा दिला होता.

यापूर्वी फेब्रुवारी 2012 मध्ये सोनमर्गमध्येच झालेल्या हिमस्खलनात 16 जवानांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, 3 फेब्रुवारी 2016ला सियाचीनमध्ये 19 हजार फूट उंचीवर 10 भारतीय सैनिकांची तुकडी गस्तीवर होती. त्यावेळी अचानक आलेल्या हिमवादळाने सर्व जवानांना गिळंकृत केलं. त्यात साताऱ्याच्या सुनील सूर्यवंशी यांच्यासह 9 जवान 25 ते 30 फूट खोल बर्फाखाली दाबले गेले. यानंतर भारतीय हवाई दलाने पूर्ण ताकद पणाला लावून या जवानांचा शोध घेतला. तब्बल सहा दिवसानंतर 9 जवानांचे मृतदेह सापडले होते.

संबंधित बातम्या :

सियाचीन ग्लेशियरमध्ये हिमस्खलन, ६ जवानांचा मृत्यू

सियाचीनमध्ये शहीद, साताऱ्याच्या वीराचं पार्थिव आज मूळगावी

सियाचीन हिमस्खलनात साताऱ्याचा सुनील सूर्यवंशी शहीद