लखनौ : उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाकडून माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव मतदार यादीतून वगळलं जाण्याची शक्यता आहे. लखनौतील गौतमबुद्ध मार्गावरील सुदामापुरी येथील मतदार यादीत त्यांचं नाव आहे. याबाबत 4 ऑक्टोबर रोजी निर्णय घेतला जाणार आहे.


अटल बिहारी वाजपेयी यांनी अखेरचं मतदान 2004 साली केलं होतं. त्यानंतर प्रकृतीच्या कारणांमुळे त्यांना मतदानासाठी जाता आलं नाही. नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या काळातच अटल बिहारी वाजपेयींचं नाव मतदार यादीतून वगळलं जाईल, अशी चर्चा होती.

अटल बिहारी वाजपेयी यांनी 2004 साली लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा मतदान केलं होतं. त्यानंतर 2007, 2012 आणि 2017 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये आणि 2009, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना मतदान करता आलं नाही.

वाजपेयी यांनी लखनौतून 1991, 1996, 1998, 1999 आणि 2004 साली विजय मिळवला होता. 1996 साली पहिल्यांदाच 13 दिवसांसाठी आणि त्यानंतर 1998 ते 2004 या काळात ते पंतप्रधान होते.