नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीसंदर्भातील वादावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय काही दिवसांत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लीम संघटना जमीयत उलेमाए हिंदचे अध्यक्ष अशरफ मदनी यांनी यावर भाष्य केले आहे. न्यायालयाचा कोणताही निर्णय आम्हाला मान्य आहे. याआधीच उत्तर प्रदेशसह देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे.


रामजन्मभूमी व बाबरी मशिद या विषयावर माननीय सुप्रीम कोर्टाकडून पुढील काही दिवसांत निकाल अपेक्षित आहेत. त्यामुळे यावरुन काही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपुर काळजी घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कालच (५ नोव्हेंबर)ला भाजप मुख्यालयातून पक्षाचे कार्यकर्ते आणि राज्यातील आयटी सेल प्रमुखांना गाईडलाइन्स जारी करण्यात आले आहे.

काय म्हणाले अशरफ मदनी?
पुरावे आणि साक्ष यांच्या आधारावर सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे. याचवेळी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लोक भीतीच्या सावटाखाली असल्याचेही ते म्हणाले.
मदनी म्हणाले, ''हे प्रकरण कायदेशीर आहे. 400 वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या मशिदीची लढाई आम्ही लढलोय. आम्हाला वाटतंय की निर्णय आमच्याच बाजूने लागेल. मात्र, आम्ही नेहमीच म्हणालोय की हा देश आमचा आहे, कोर्ट आमचे आहे, कायदा आमचा आहे. त्यामुळं आम्ही निर्णय घेतलाय की जो कोर्ट निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल. या प्रकरणी देशातील प्रत्येक नागरिकाने कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करायला हवा आणि देशात शांती प्रस्थापित करावी".

निर्णयाआधी अयोध्येत अलर्ट -
पुढील काही दिवसांत अयोध्या वादावर निर्णय येणार आहे. अयोध्येत 14 कोसी परिक्रमेला मंगळवापासून सुरुवात झाली आहे. हजारो श्रद्धाळू अयोध्येत दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे प्रशासन हाय अलर्टवर आहे. सरन्यायाधीश गोगोई १७ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्याधीच निर्णय येण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अयोध्येत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशच्या सर्व जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे. 14 कोसी आणि पंच कोसी परिक्रमेसाठी निमलष्करी दलासोबतच PAC (Provincial Armed Constabulary)लाही तैनात करण्यात आले आहे. सोबतच सोशल मीडियावरही करडी नजर ठेवण्यात येत आहे. तर, केंद्र सरकारने CRPF च्या 4 हजार जवानांना उत्तर प्रदेशमध्ये पाठवले आहे.