नवी दिल्ली : भाजपचं लक्ष केवळ भगवानगडावरच्या दसरा मेळाव्याकडे लागलं आहे, असं म्हणत भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला टोला लगावला. ते नवी दिल्लीत बोलत होते.


मुंबईतील शिवाजी पार्कवर दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा होतो. मात्र आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार, याची उत्सुकता आहे.

याबाबत आशिष शेलार यांना विचारलं असता ते म्हणाले की, भाजपचं लक्ष जर कुठल्या दसरा मेळाव्याकडे लागलं असेल तर भगवानगडावरच्या मेळाव्याकडे.

भाजप शतप्रतिशत पंकजा मुंडेंच्या पाठिशी

तसंच भगवानगड वादामध्ये भाजप शतप्रतिशत पंकजा मुंडे यांच्या पाठिशी आहे. त्यांच्या भूमिकेकडे पक्षाचं लक्ष असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं.

सोमय्यांचं विधान पक्षाची अधिकृत भूमिका नाही

मुंबई महापालिका निवडणुकीविषयी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, भाजपने सहा महिने आधीच तयारी सुरु केली आहे. खासदार किरीट सोमय्या यांनी पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याच्या मनातील भावना मांडली. पण सोमय्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत यावर चर्चा करु आणि त्यानंतर मुख्यमंत्री भाजपच्या अधिकृत भूमिकेवर निर्णय घेतील.

पाहा व्हिडीओ