नवी दिल्ली:  केवळ लोकपालवर मुद्दा अडलाय, असं मंत्री गिरीश महाजन जे म्हणाले ते बरोबर नाही. यातून केवळ जनतेची दिशाभूल होतेय. दीडपट हमीभाव ही प्रमुख मागणी आहे, तो कसा देणार, त्याची काय पद्धती, याबद्दल सरकार काही बोलत नाही, असं  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.


शेतकऱ्याच्या पीकाचे भाव ठरवण्याचे अधिकार कृषी मंत्रालयाकडून काढून घ्या. कृषी मूल्य आयोगाला निवडणूक आयोगाप्रमाणे स्वतंत्र दर्जा द्या, अशी मागणी अण्णांनी केली आहे.

मराठवाडा, विदर्भात हमीभावापेक्षा 53 टक्के भाव कमी दिलेले आहेत. भविष्यात उत्पन्नाच्या दीडपटीपेक्षा कमी हमीभाव दिला तर तो सरकारनं भरुन दिला पाहिजे, असं अण्णा म्हणाले.

माझ्या मागण्यांवर मी ठाम आहे. कुणी केंद्रातूनच यावं असं वाटत नाही, मला काही फरक पडत नाही, असं त्यांनी नमूद केलं.

विलासरावांनी जी भूमिका वठवली आंदोलनात ती चांगली, पण सरकारने आश्वासन पाळलं नाही, असं अण्णांनी सांगितलं.

माझ्याबद्दल लोकांच्या मनात विश्वास कमी झाला असेल, त्यामुळे गर्दी कमी झाली असावी, असं अण्णा म्हणाले.

याशिवाय यावेळी रामदेवबाबा, श्री श्री रवीशंकर, राजू शेट्टी हे सोबत नाही, त्याबाबत विचारलं असता, ‘एकला चलो रे’ हेच माझं तत्व आहे, असं त्यांनी सांगितलं.

कोअर कमिटीतल्या सदस्यांबाबत आरोप होत आहेत, काळजी घ्यायला पाहिजे होती का, असं विचारलं असता, ती काळजी मी घेतली नाही असं लोक म्हणत असतील तर म्हणू द्या. मला फरक नाही, असं अण्णा म्हणाले.

VIDEO:



अण्णांच्या नेमक्या मागण्या काय आहेत?

शेतकऱ्यांचे प्रश्न

कृषी उत्पन्नाला उत्पादन खर्चाच्या आधारावर 50 टक्के अधिक भाव मिळावा

शेतीवर अवलंबून असलेल्या 60 वर्षांवरील शेतकरी आणि मजुरांना दरमहा 5 हजार रुपये पेन्शन द्यावं

कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तता द्यावी, सरकारी हस्तक्षेप नसावा

पिकाचा सामूहिक नव्हे, तर वैयक्तिक विमा असावा

लोकपाल, लोकायुक्त संदर्भातल्या मागण्या

जनलोकपाल कायदा त्वरीत लागू करावा, लोकपालची नियुक्ती व्हावी

लोकपाल कायदा कमकुवत करणारे कलम 63 आणि 44 मध्ये बदल करावा

केंद्राच्या लोकपालप्रमाणे प्रत्येक राज्यात सक्षम लोकायुक्त कायदा लागू करावा

निवडणुकीसंदर्भातल्या मागण्या

बॅलेट पेपरवर उमेदवाराचा कलर फोटो हेच निवडणूक चिन्ह असावं

मतमोजणीसाठी टोटलायझर मशिनचा उपयोग केला जावा

NOTA ला Right To Reject चा अधिकार दिला जावा

लोकप्रतिनिधिला परत बोलावण्याचा Right To Recall अधिकार जनतेला असावा

संबंधित बातम्या :

रामलीलावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं आऊटपुट भाजप कार्यालयात?

अण्णांनी केंद्राच्या मसुद्यात त्रुटी दाखवल्या, उपोषण लांबणार : सूत्र