अमृतसर : पंजाबमधील अमृतसर रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 61 वर पोहोचली आहे. या अपघाताच्या 16 तासांनंतर राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी घटनास्थळाला भेट दिली. परंतु अवघ्या दीड मिनिटातच सुरक्षारक्षकांच्या गराड्यात अमरिंदर सिंह आपली भेट आटोपली. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक आमदार आणि मंत्री नवज्योत सिंह सिद्धू हे देखील उपस्थित होते.


रेल्वे अपघातानंतर संतप्त नागरिकांची घटनास्थळी जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. सुरक्षारक्षकांच्या फौजफाट्यात मुख्यमंत्री दाखल तर झाले परंतु रेल्वे रुळापर्यंत पोहोचू शकले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आपली भेट आवरावी लागली.

अपघातानंतर 16 तासांनी घटनास्थळी भेट दिल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले की, "मी इस्रायल दौऱ्यावर जात होतो. दिल्ली विमानतळावर मला अपघाताची माहिती मिळाली. दौरा रद्द करुन मी इथे आलो. जर मी काल इथे आलो असतो, तर सगळ्या अधिकाऱ्यांना व्हीव्हीआयपीची व्यवस्था करावी लागली असती, त्यामुळे मोठा गोंधळ झाला असता."

या रेल्वे अपघाताबाबत मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, "एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही. न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. अहवाल आल्यानंतरच या दुर्घटनेसाठी जबाबदार कोण हे स्पष्ट होईल." "तसंच नवज्योतसिंह सिद्धू यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढू नका. त्यांनाही अपघाताचं दु:ख आहे," असंही मुख्यमंत्री अमरिंदर सिंह म्हणाले.

कसा झाला अपघात?
जोडा फाटक परिसरात रावण दहन आणि फटाके फुटल्यानंतर गर्दीपैकी काही लोक रेल्वे रुळावर आले. रुळावर आधीपासूनच मोठ्या संख्येने लोक रावण दहन पाहत होते. संध्याकाळी सातच्या सुमार जोडा फाटकवरुन डीएमयू ट्रेन आली. ही डीएमयू ट्रेन जालंधरहून अमृतसरला जात होती. ही भरधाव ट्रेन रुळावर उभे असलेल्या लोकांना उडवत निघून गेली. रावण दहनाच्या वेळी फटाक्याच्या आवाजामुळे ट्रेन आल्याचं समजलं नाही आणि हा दुर्दैवी अपघात झाला.

प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं काय?
प्रत्यक्षदर्शींनी प्रशासनावर प्रंचड संताप व्यक्त केला आहे. पहिली गोष्ट म्हणजे कार्यक्रमाची वेळ ही सायंकाळी सहा वाजताची होती. पण कार्यक्रमासाठी नवज्योत सिंह सिद्धू यांची पत्नी येणार होत्या. त्या जवळपास साडे सात वाजता आल्या आणि ही ट्रेनची वेळ होती. विशेष म्हणजे ही घटना घडताच सिद्धू यांच्या पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी घटनास्थळाहून पळ काढला. त्यामुळे लोक नवज्योत सिंह सिद्धू यांच्याविरोधात घोषणा देत आहेत.

प्रत्यक्षदर्शींचा दुसरा आक्षेप म्हणजे, ट्रेन येण्यापूर्वी कोणतीही सूचना देण्यात आली नाही. कार्यक्रमाच्या वेळी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी चालू होती, ज्यामुळे ट्रेनचा हॉर्न ऐकायला आला नाही. पण प्रशासनाने पूर्वसूचना देणं गरजेचं होतं, अशं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.

रेल्वेचं स्पष्टीकरण

रेल्वे राज्यमंत्री, रेल्वे बोर्ड चेअरमन आणि इतर सर्व प्रमुख अधिकारी रात्रीच घटनास्थळावर पोहोचले. ही घटना रेल्वे फाटकापासून काही अंतरावर घडली, जिथे लोक रेल्वे रुळावर उभे होते, अशी माहिती रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी स्मिता वत्स यांनी दिली.

मदतीची घोषणा
अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने प्रत्येकी दोन लाख तर राज्य सरकारने पाच लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसंत दुर्घटनेतील जखमींवर मोफत उपचार करण्याची घोषणा मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी केली.

संबंधित बातम्या

LIVE: अमृतसर रेल्वे अपघात; मृतांचा आकडा 61 वर

अमृतसर अपघात, नवजोत कौर यांनी घटनास्थळाहून पळ काढला : प्रत्यक्षदर्शी

अमृतसर रेल्वे दुर्घटना : पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त

अमृतसर ट्रेन अपघात, आतापर्यंत 58 जणांचा मृत्यू : पंजाब पोलीस