नागपूर: भाजप अध्यक्ष अमित शाह यांचं भाजप कार्यकारिणीच्या बैठकीतलं वादळी भाषण एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. ज्यात अमित शाहांनी महाराष्ट्रातील भाजप आमदार-खासदारांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत.


इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा भाजप आणि नरेंद्र मोदी यांचंच नाव लिहिलं जायला हवं, बाबा रामदेव किंवा श्रीश्री रवीशंकर यांचं नाही, असं अमित शाह म्हणाले.

भाजपने रामदेव बाबा आणि श्री श्री रवीशंकर यांचा चेहरा वापरुन विरोधकांवर टीकास्त्र सोडलं. मात्र आता त्यांचीच नाव भाजपला नको आहेत.

यावर्षीचा योग दिवस भाजप नेत्यांनी गांभीर्यानं घेतला नाही. नीटपणे कार्यक्रमांची आखणी केली नाही. त्यामुळे सगळीकडे फक्त श्रीश्री आणि रामदेव यांचीच चर्चा होती. त्यामुळे अमित शाह दुखावलेत.

काँग्रेसनं गांधी नेहरुंचा खूप गवगवा केला. त्याला भाजपनं पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावानं योजना आणून उत्तर दिलं. पण भाजप नेते त्याबाबत फारच निरुत्साही दिसल्यानं शाह संतापले

अमित शाह काय म्हणाले?

आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा भाजप आणि नरेंद्र मोदी यांचंच नाव लिहिलं जायला हवं, बाबा रामदेव किंवा श्रीश्री रवrशंकर यांचं नाही.

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीचे कार्यक्रम जनतेपर्यंत नीट पोहोचले नाहीत. आता त्यांचा आत्मा पाहात असेल तर त्यांना पश्चाताप होत असेल, असं म्हणत शाह यांनी भाजप नेत्यांची हजेरी घेतली.

महाराष्ट्र भाजपला कठोर शब्दात सुनावलं

महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना सुनावतांना अमित शाहांनी जास्त कठोर शब्द वापरलेत. पक्ष कार्यालयं, नवं नेतृत्व, प्रदेश कार्यकारिणीचे रिपोर्ट यावर त्यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि इतर नेत्यांची चांगलीच झडती घेतली. अमित शाह म्हणाले -

  • भाजपची कार्यालयं उभारण्यासाठी पियुषभाई पैसे पाठवू इच्छितात, मात्र कुणी ते स्वीकारायला तयार नाही.

  • मीडियात पक्षाची बाजू मांडण्यासाठी एकही नवं नाव राज्याकडून दिलं गेलं नाही. गेल्या 5 कार्यकारिणीत सातत्यानं नवी नावं मागितली होती.

  • पुस्तकालय कार्यक्रमात मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि यूपी सोडून सगळी राज्यं असफल झाली आहेत.

  • प्रदेश कार्यकारिणीचे रिपोर्ट कसे द्यायचे याचा तपशील दिला, मात्र एकही रिपोर्ट आला नाही.

  • 1 लाख लोकांनी नरेंद्र मोदी अॅप डाऊनलोड करावं, असं टार्गेट होतं, मात्र त्याची साधी सुरुवातही झाली नाही.

  • पार्टी फंडासाठी एकच खातं असावं याचा निर्णय झाला, पण अजूनही प्रदेश कार्यकारिणीनं तो आदेश पाळला नाही.




माझाला माहिती

कार्यकारिणीचं भाषण अर्थातच फक्त नेते, खासदार, आमदारांसाठी होतं. पण भाजपमधील सूत्रांनी त्याची बित्तंबातमी माझाच्या प्रतिनिधींना दिली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना याबद्दल विचारलं. मात्र ते काहीच न बोलता निघून गेले. त्यांनी बातमी नाकारली नाही, यातच सगळं आलं.

मोदी-शाह चिंतेत

नोटाबंदी, जीएसटीमुळे भाजपची प्रतिमा आता मलीन होऊ लागलीय. सोशल मीडियातही नकारात्मक प्रचार होतोय. त्यात मार्गदर्शक मंडळानं जाहीरपणे मोदी-शाह यांची लक्तरं काढायला सुरुवात केलीय. त्यामुळे शाह-मोदी चिंतेत आहेत.