नवी दिल्ली : निश्चलनीकरणाची प्रक्रिया संपत आली असून लवकरच आर्थिक व्यवहारांवरचे निर्बंध पूर्णपणे शिथील केले जातील, अशी माहिती अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी दिली. 8 नोव्हेंबरनंतर आर्थिक व्यवहारांवर घालण्यात आलेले निर्बंध जवळपास शिथील करण्यात आले आहेत. बँकेतील बचत खात्यातून आठवड्याला 24 हजार किंवा महिन्याला 96 हजार रूपये रक्कम खूपच कमी असल्यानं रिझर्व्ह बँक लवकरच हे निर्बंध उठवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.


"नोटाबंदीनंतर घालण्यात आलेले सारे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत, आता फक्त बचत खात्यांमधून दर आठवड्याला 24000 रुपये काढण्याची मर्यादा आहे. मात्र ही मर्यादाही लवकरच संपुष्टात येईल," अस शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केलं. नवीन चलनाचा पुरवढा आणि व्यवस्थापन ही रिझर्व्ह बँकेची जबाबदारी आहे. तसंच लवकरच सध्या आर्थिक व्यवहारांवर घालण्यात आलेले निर्बंधही रिझर्व्ह बँकेकडून शिथील केले जातील, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

सध्या बँक खात्यातून 1 लाखांपर्यंत रक्कम काढता येते. त्यामुळे आर्थिक व्यवहारांवरील निर्बंध संपल्यात जमा आहे. मात्र बचत खात्यांमधून 24 हजार काढण्याची मर्यादा आहे. मागच्याच आठवड्यात ही दिवसाला 24 हजार काढण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र आठवड्यात एकूण 24 हजारांची मर्यादा अद्यापही कायम आहे.