नवी दिल्ली : दिल्लीत आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदासाठी नाव आज निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. मात्र त्याच्या एकदिवस आधीच सर्वपक्षीयांच्या आज दिल्लीत बैठका होणार आहेत. त्यामुळे एनडीएच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काँग्रेससह विरोधी पक्षांनी उपराष्ट्रपतीपदासाठी अगोदरच नाव जाहीर केलं आहे. विरोधी पक्षांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आता उपराष्ट्रपतीपदासाठी गोपालकृष्ण गांधी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

गोपालकृष्ण गांधी यांचा अल्पपरिचय

गोपाळकृष्ण गांधी (जन्म: २२ एप्रिल १९४५) हे एक भारतीय सनदी अधिकारी व पश्चिम बंगाल राज्याचे २००४ ते २००९ दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. गोपालकृष्ण गांधीं हे अशोका विद्यापीठातील इतिहास विभागाचे माजी प्रमुख आणि दक्षिण आफ्रिकेतीत भारताचे राजदूत होते. याशिवाय त्यांनी भारतीय विदेशी सेवेमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली. ते एक विख्यात विद्वान असून गांधी आणि आंबेडकरयंच्या विचारांचे साक्षेपी अभ्यासक होते.

गोपाळकृष्ण गांधी हे महात्मा गांधींचे नातू व देवदास गांधींचे पुत्र आहेत.

उपराष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम:

– 4 जुलैला उपराष्ट्रपती निवडणुकीची अधिसूचना जारी होईल.

– 18 जुलैला निवडणूक अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख

– 21 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार

–  5 ऑगस्टला मतदान

–  5 ऑगस्टलाच मतमोजणी

उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून तीन नावांची चर्चा

उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपणार आहे. दरम्यान, आता उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून तीन नावांची चर्चा आहे. यामध्ये सर्वात आधी नावं केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचं आहे. तर त्यानंतर आनंदीबेन पटेल आणि हुकूमदेव नारायण यांच्या नावाची चर्चा आहे.

मात्र, असं असलं तरीही पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नेमकं  कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.