नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामाच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश कार्मिक मंत्रालयाने रविवारी दिले आहेत. कार्मिक मंत्रालयानं दिलेल्या निर्देशांनुसार, सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना कामाच्या दिवशी कार्यालयात उपस्थित राहावं लागणार आहे. राष्ट्रीय राजधानीसहीत देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. परंतु, कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकारनं काह निर्णय घेतल्याचं सागितलं आहे.


कार्मिक मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, कन्टेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये येणं बंधनकारक नसणार आहे. त्यांना यातून सूट देण्यात येईल. जोपर्यंत ते राहत असलेला झोन डी-नोटिफाइड होत नाही. तोपर्यंत त्यांना ऑफिसमध्ये येण्यापासून सूट देण्यात येईल.





ऑफिस करावं लागणार सॅनिटाइझ


नव्या गाईडलाईन्सनुसार, जर ऑफिसमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं, तर तो कर्मचारी ज्या ठिकाणी बसतो आणि 48 तासांत जिथे-जिथे गेला आहे. केवळ त्याच ठिकाणी सॅनिटाईझ करावं लागेल. जर कार्यालयात कोरोना बाधितांची संख्या वाढली तर तो मजला किंवा बिल्डिंग सॅनिटाइझ करावी लागणार आहे.


दरम्यान, यापूर्वी केंद्र सरकारने मे 2020 मध्ये उपसचिव स्तराखालील 50 टक्के कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयात जाऊन काम करण्यास सांगितलं होतं. आता सर्वच कर्मचारी कार्यालयात हजर राहणार असल्यामुळे गर्दी टाळण्यासाठी वेळेचं नियोजन करावं लागणार आहे.