नवी दिल्ली: एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांच्याविरोधात दिल्ली एअर इंडियानं पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता प्रशासन रविंद्र गायकवाड यांच्यावर नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. रवींद्र गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. त्यांचं बिझनेस क्लासचं तिकीट असताना त्यांना इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं. रवींद्र गायकवाड त्याची तक्रार दिल्लीत गेल्यावर करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाड यांनी केला. विमानातून सर्व कर्मचारी उतरुन गेल्यानंतरही रवींद्र गायकवाड बसून राहिले. तक्रार करण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यानतंर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. मात्र त्या कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली, असं रवींद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे. "मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही, मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो, अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली. कोण आहेत रवींद्र गायकवाड? •    रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत •    लोकसभा निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला. •    उस्मानाबाद आणि परिसरात रवी सर म्हणून ते परिचीत आहेत •    रवींद्र गायकवाड हे उमरगा मतदारसंघातून दोन वेळ विधानसभेवर निवडून गेले होते. •    दुष्काळी भागात पाझर तलावासाठी त्यांनी काम केलं आहे. •    तसंच उस्मानाबाद परिसरातील वीजेच्या प्रश्नासाठीही आवाज उठवला.ट VIDEO: संबंधित बातम्या: ... म्हणून मी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला 25 सँडल मारले : रवींद्र गायकवाड