नवी दिल्ली : मेघालय विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि एनपीपीमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. आतापर्यंतचे हाती आलेले पाहता काँग्रेस सध्या 19 जागांवर आघाडीवर आहे तर एनपीपी 18 जागेवर आघाडीवर आहे. तर इतर 19 जणही आघाडीवर आहेत.

त्यामुळे मेघालयमध्ये कोण सत्ता स्थापन करणार याबाबत अद्याप चित्र अस्पष्ट आहे. त्यासाठीच काँग्रेसने अपक्ष उमेदवारांशी बोलणी करण्यासाठी अहमद पटेल आणि मुकूल वासनिक आणि कमलनाथ यांना मेघालयला पाठवण्यात आलं आहे.



सुत्रांच्या माहितीनुसार, वरिष्ठ काँग्रेस नेते अहमद पटेल आणि कमलनाथ मेघालयमध्ये सत्ता स्थापन व्हावी यासाठी आज सकाळीच शिलाँगला रवाना झाले आहेत. ते अपक्ष आमदारांशी चर्चा करुन सत्ता स्थापन करु शकतात.

मेघालयमध्ये सध्या काँग्रेसचं सरकार असून येथील बऱ्याच ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. गोवा आणि मणिपूरमध्ये झालेल्या चुका लक्षात घेत आता काँग्रेस या ठिकाणी झटपट पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे.

गोवा आणि मणिपूरमध्ये सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेसला इथे सत्ता स्थापन करता आली नाही. या दोन्ही ठिकाणी भाजपने अपक्ष आणि स्थानिक पक्षांसोबत युती करुन सत्ता स्थापन केली. त्यामुळे आता काँग्रेसने पुन्हा तिच चूक न करण्याचं ठरवत आपल्या ज्येष्ठ नेत्यांना मेघालयमध्ये पाठवलं आहे.

संबंधित बातम्या :

मेघालयमध्ये त्रिशंकू अवस्था, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष