Vaishno Devi Stampede : नवीन वर्षाच्या दिवशीच जम्मूमधील वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी घटना घडली. यामध्ये 13 लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. याबाबत, श्राइन बोर्डाने म्हणजे वैष्णोदेवी मंदिर समितीने  त्यांची भूमिका मांडली आहे. यात्रेकरूंच्या दोन गटांमधील भांडणामुळे चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 35,000 यात्रेकरूंना परवानगी देण्यात आली होती, असेही समितीने सांगितले आहे. मात्र, या घटनेवरुन मंदिर समितीवर  विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


चेंगराचेंगरीच्या घटना घडल्यानंतर एका तासाने पुन्हा दर्शनाला परवानगी देण्यात आली, त्यामुळे यात्रा सुरू राहीली. शनिवारी जवळपास 27 हजार भाविकांनी  वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. यानंतर या घटनेची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने घटनास्थळी भेट देत चौकशी केली. 


स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी भाविकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर नारायण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्याची कोणताही व्यवस्था मंदिर समितीने केली नव्हती, अशी माहिती तेथील नागरिकांनी दिली आहे. गर्दीबाबत मंदिर समितीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. अशात दर्शनाच्या पद्धती बदलण्याचा विचारही सरकार करत आहे. दरम्यान, मंदिर समितीच्या विरोधात अनेक लोकांनी घोषणाबाजी केल्याचेही पाहायला मिळाले. या घटनेबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एका दिवसाचा दर्शनाचा कोटा हा 25 हजार भाविकांचा असताना, घटनेवेळी 50 ते 60 हजार भाविक उपस्थित कसे होते. असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय. या घटनेत मृत्यू झालेल्यांचे वय हे 24 ते 35 च्या दरम्यान आहे.


या घटनेबाबत पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी जम्मू आणि कश्मीर प्रशासनाला जबाबदार धरले आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. कोरोनाचे नियम असूनही एवढ्या मोठ्या संख्येने यात्रेकरु जमा झाले कसे? असा सवाल यावेळी मुफ्ती यांनी उपस्थित केला आहे.


नेमकी कशी घडली घटना


नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी वैष्णो देवी मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती.  गर्दी एवढी होती की, व्यवस्थित उभा देखील राहता येत नव्हते. या गर्दीमुळे रात्री 2 सुमारास अचानक गोंधळ झाल्यान लोकांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर चेंगराचेंगरीची घटना घडली. याबाबत पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. सरकारकडून दुर्घटनेत मृत पावलेल्या भाविकांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये प्रत्येकी तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत घोषित केली आहे. शिवाय मदतीसाठी हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आला आहे.