नवी दिल्ली : पाच राज्यांचे एक्झिट पोल समोर आल्यानंतर देशात अजूनही मोदी लाट कायम असल्याचं चित्र आहेत. ज्या मोदी लाटेवर सवार होत भाजपने उत्तर प्रदेशमध्ये 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 73 जागा मिळवल्या होत्या, तिच लाट कायम असल्याचं एक्झिट पोलमधून दिसत आहे. एबीपी न्यूज आणि सीएसडीएसचा एक्झिट पोल एक्झिट पोलनंतर उत्तर प्रदेशमध्ये भाजप 164-176 जागांसह सर्वात मोठा पक्ष आहे. तर काँग्रेसच्या हाताची साथ घेतलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव 156-169 जागांवर आहेत. तर मायावती यांना मोठा धक्का बसला आहे. एक्झिट पोलनुसार बसपाला केवळ 60 ते 72 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. नोटाबंदीनंतर संपूर्ण देशभरातील विरोधक मोदींविरोधात एकत्र आले होते. त्यामुळे याचा फटका भाजपला उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये बसेल, असा अंदाज लावला जात होता. मात्र उत्तर प्रदेशच नव्हे, तर उत्तराखंडमध्ये काँग्रेसला हरवून भाजपने झेंडा फडकावल्याचं चित्र एक्झिट पोलमध्ये आहे. एबीपी न्यूजच्या सर्व्हेनुसार उत्तराखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. इथे भाजपला 34-42 आणि काँग्रेसला 23-29 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 2014 लोकसभा निवडणुकीनंतर केवळ बिहार आणि दिल्ली हे दोनच राज्य असे आहेत, जिथे मोदी लाट दिसली नाही. मात्र हरियाणा, झारखंडमध्ये भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष होत शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली. आसामच्या जनतेनेही भाजपच्याच पारड्यात मतं टाकली. केरळमध्ये मोदींच्या नावावर भाजपने जवळपास 10 टक्के मतं मिळवली. जम्मू काश्मीरमध्ये युती करत भाजपने सत्ता मिळवली. मात्र आता 2017 मध्ये पाच राज्यातही भाजपच आघाडीवर असल्याचं एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या आकड्यांमध्ये दिसत आहे. 2014 लोकसभेनंतरची मोदी लाट
2014 नंतर दिल्ली आणि बिहारमध्ये पराभव
हरियाणा, झारखंडमध्ये स्वबळावर सत्ता
महाराष्ट्रात सत्ता स्थापन करत भाजप सर्वात मोठा पक्ष
जम्मू काश्मीरमध्येही युती सरकार
आसाममध्ये सत्ता स्थापन
केरळमध्ये पहिल्यांदाच खातं उघडत 10 टक्के मतं मिळवली
एक्झिट पोलनुसार पाच पैकी 4 राज्यात भाजप आघाडीवर
एक्झिट पोलनंतर देशात भाजप कुठे-कुठे? एक्झिट पोलपूर्वी देशातील 36 टक्के जनतेचा कौल एकट्या भाजपला होता. तर देशातील 43 टक्के लोकसंख्येवर भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीचं राज्य होतं. मात्र एक्झिट पोलनंतर देशातील 52 टक्के जनतेनं भाजपला कौल दिल्याचं दिसतंय. तर भाजप आणि मित्रपक्षांच्या युतीचं यश त्यात जोडलं तर हा आकडा 58 टक्क्यांवर जाईल.
उत्तर प्रदेश - 16.05 टक्के
महाराष्ट्र - 9.3 टक्के
मध्य प्रदेश - 6.0 टक्के
राजस्थान - 5.7 टक्के
गुजरात - 5.0 टक्के
झारखंड - 2.7 टक्के
आसाम - 2.58 टक्के
छत्तीसगड - 2.1 टक्के
हरियाणा - 2.1 टक्के
उत्तराखंड - 0.83 टक्के
गोवा - 0.1 टक्के
एकूण लोकसंख्या - 52.71 टक्के
देशात भाजप-युतीची सत्ता
आंध्र प्रदेश - 4.8 टक्के
जम्मू काश्मीर - 1.06 टक्के
अरुणाचल - 0.11 टक्के
एकूण लोकसंख्या - 5.25 टक्के
एक्झिट पोलनंतर काँग्रेस कुठे? एक्झिट पोलनंतर काँग्रेसची चिंता वाढली आहे. कारण एकेकाळचा देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचं देशातल्या केवळ 8.47 टक्के लोकसंख्येवर राज्य आहे.