नवी दिल्ली: पाच राज्यातील मतदान आज सपलं असून आता सगळ्यांनाच निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. पाचही राज्यात भाजपचं सरकार नसल्यानं भाजपसमोर एक मोठं आव्हान आहे. या सगळ्याचा खुलासा 19 मेला निकालाचा दिवशी होणार आहे.


 

निवडणुकीनंतर एबीपी माझा आणि नेल्सननं सर्व्हे केला आहे. या सर्व्हेनुसार, आसाममध्ये पहिल्यांदाच कमळ फुलण्याची शक्यता आहे. तर प. बंगालमध्ये ममतांना कौल मिळत असल्याचं समजतं आहे.

 

या सर्व्हेनुसार, भाजपला आसाममध्ये संपूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार आसाममध्ये भाजप-एजीपी-बीपीएफला 81 जागा, काँग्रेसला 33 तर एयूडीएफला 10 तर इतर 2 जागा मिळण्याची शक्यता आहे.

 

तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची जादू कायम राहणार असल्याचं दिसून येतं आहे. मात्र, मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा त्यांच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. सर्व्हेनुसार, तृणमूल काँग्रेसला 163 जागा, डाव्यांना 126 जागा, भाजपला 1 तर इतरांना 4 जागा मिळण्याची शक्यता आहे.

 

कसा करण्यात आला सर्व्हे?
प. बंगालमध्ये 294 जागांपैकी 147 जागेवर एक्झिट पोल घेण्यात आला. ज्यामध्ये 34526 मतदार सहभागी झाले होते. 6 टप्प्यामध्ये मतदान घेण्यात आलं.

 

तर आसाममध्ये 126 जागांपैकी 63 जागांवर सर्व्हे करण्यात आला. 14271 मतदार सहभागी होते.