मुंबई | एबीपी माझा वृत्तवाहिनीने मतदारांचा सातत्यानं बदलणारा कल जोखण्यासाठी सीव्होटरच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आज जाहीर करण्यात आले आहेत. देशभरातील मतदारांचा कौल जाणून घेतला असता अनुकूल समीकरणं जुळली तर एनडीएला 300, यूपीएला 116 तर इतर पक्षांना 127 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपसोबत युती केली, तर एनडीएला पहिल्या क्रमांकाच्या 34 जागा मिळतील. तर यूपीएला 14 जागांवर झेंडा फडकवता येईल.


त्याचवेळी महाराष्ट्रात सर्व पक्ष वेगळे लढले तर भाजप आणि मित्रपक्षांना 37.8 टक्के मतांसह 23 जागा, काँग्रेस आणि मित्रपक्षांना 28.5 टक्के मतांसह 14 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 13.5 टक्के मतांसह 6 जागा तर शिवसेनेला 8.5 टक्के मतांसह 5 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतर पक्षांना महाराष्ट्रात 11.7 टक्के मते मिळणार असली तरी जागा मात्र मिळण्याची शक्यता नाही.

देवेंद्र फडणवीस सरकारबद्दल काय वाटतं महाराष्ट्राला? ते जाणून घेण्याच्या प्रयत्नात मराठी माणसांना बोलतं केलं असता राज्यातील सर्वात सक्षम नेता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 19.3 टक्के मतदारांनी कौल दिलाय तर शरद पवारांना 18.7 टक्के आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना 11.8 टक्के मतदारांनी पसंती दर्शवली आहे. त्याचवेळी सरकारच्या जलयुक्तशिवार योजनेमुळे झालेल्या फायद्याबद्दल जवळपास समान मते असली तरी मराठा आरक्षण आणि शेतकरी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर मात्र जनमत सरकारविरोधात असल्याचं स्पष्ट झालं आहे.

एबीपी माझाच्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील सर्वात सक्षम नेता कोण? असा प्रश्नही विचारण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पहिल्या क्रमांकाचा 19.3% कौल, तर दुसऱ्या क्रमांकावर शरद पवार (18.7%) , तिसऱ्या क्रमांकावर उद्धव ठाकरे (11.8%) आहेत. त्यांच्यानंतर नितीन गडकरी (11%), राज ठाकरे  (9%), अशोक चव्हाण (7.5%), अजित पवार (5.1%), तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना 3.9% लोकांनी सक्षम नेता मानलं आहे. सुप्रिया सुळेंना अवघे 2.2 टक्के मतदारच सक्षम नेते मानतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कामगिरीबद्दल खूप समाधानी असल्याचं 25.5 टक्के मतदारांनी म्हटलं, तर 31.9 टक्के मतदारांना त्यांचा कारभार काही प्रमाणात का होईना समाधानकारक वाटतो. तर त्याचवेळी मुळीच समाधानी नसणारे 41 टक्क्यांच्या घरात आहेत. अर्थात सरकारवर समाधानीवर्ग त्यापेक्षा 15 टक्क्यांनी जास्त आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असल्याचं स्पष्ट होतं. त्यांचा कारभार समाधानकारक मानणारे 64 टक्के आहेत. तर 35 टक्क्यांना तसं वाटत नाही. मात्र इतर नेत्यांशी तुलना केल्यावर पंतप्रधान म्हणून त्यांना मिळणारी पसंतीची मतं 47 टक्क्यांपर्यंतच आहेत. तर राहुल गांधी 17.6, सोनिया गांधी 3 टक्के, मनमोहन सिंह 3.8 टक्क्यांची म्हणजेच काँग्रेस नेत्यांची लोकप्रियता आजही 24 टक्क्यांपर्यंतच घुटमळते. मात्र महाराष्ट्रातील 13.4 टक्के मतदारांचा कौल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांना आहे.

पाणीटंचाई दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना खूप प्रभावी ठरल्याचा सरकारी दावा असला तरी सामान्यांना ते पूर्णपणे मान्य नसावं. त्यामुळेच 48.7 टक्क्यांनी त्या योजनेमुळे पाणीटंचाई दूर झाल्याचं मान्य केलं असतानाच 43.7 टक्के मतदारांनी विरोधी मत नोंदवलं आहे.

शेतकरी कर्जमुक्तीच्या बाबतीत मात्र सरकारवर सामान्यांचा विश्वासच नसल्याचं दिसतं. शेतकऱ्यांना फायदाच झाला नसल्याचं 56.7 टक्के मतदारांचं मत आहे. तर फक्त 36.7 टक्के शेतकऱ्यांना लाभ झाल्याचं सांगतात.

मराठा आरक्षणाचा मुद्दाही तसाच. हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देणारच नाही असं 61 टक्के मतदारांना वाटतं, तर फक्त 26.6 टक्के मतदारांना सरकार आरक्षण देईल, अशी आशा आहे. या प्रश्नावर सांगता येत नाही म्हणणारे 11 टक्के आहेत.

भारिप बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमच्या ओवेसींशी केलेली आघाडी काँग्रेसचंच नुकसान करणारी ठरेल या राजकीय विश्लेषकांच्या मतांशी बहुतांश मराठी मतदारही सहमत आहेत. आंबेडकर-ओवेसी एकत्र आल्यानं दलित-मुस्लिम मतांचं ध्रुविकरण होऊन भाजपला फायदा होईल, असं निम्म्या म्हणजे 49.5 टक्के मतदारांचं मत आहे. तर 43.6 टक्के मतदारांना तसं वाटत नाही.

काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीने मनसेला सोबत घ्यावं का? असा प्रश्न विचारला असता 46.3 टक्के मतदारांनी होय म्हटलं असलं, तरी 48.1 टक्के मतदारांनी नकार दिला आहे.

एबीपी माझा - मूड महाराष्ट्राचा (ऑक्टोबर 2018)

देशाचा कौल कुणाला?

(जागा)

एनडीए  : 300

यूपीए : 116

इतर : 127

------------------------------------------

देशाचा कौल कुणाला?

(मतांची टक्केवारी )

एनडीए : 38.4 %

यूपीए  : 26%

इतर : 35.6%

 ------------------------------------------

महाराष्ट्राचा कौल कुणाला?

(मतांची टक्केवारी - सर्व पक्ष स्वतंत्र लढले तर)

भाजप+  : 37.8% :

काँग्रेस+ :  28.5%

राष्ट्रवादी काँग्रेस :  13.5%

शिवसेना : 8.5%

इतर : 11.7 %

------------------------------------------

महाराष्ट्राचा कौल कुणाला?

(जागा –  सर्व पक्ष स्वतंत्र लढले तर)

भाजप+  : 23

काँग्रेस+ : 14

राष्ट्रवादी काँग्रेस : 6

शिवसेना : 5

------------------------------------------

महाराष्ट्राचा कौल कुणाला?

(जागा – युती विरुद्ध आघाडी जसं आहे तसं)

एनडीए  : 34

यूपीए  : 14

------------------------------------------

महाराष्ट्रातील सर्वात सक्षम नेता कोण?

देवेंद्र फडणवीस : 19.3%

शरद पवार : 18.7%

उद्धव ठाकरे : 11.8%

नितीन गडकरी : 11%

राज ठाकरे : 9%

अशोक चव्हाण : 7.5%

अजित पवार : 5.1%

पृथ्वीराज चव्हाण : 3.9%

सुप्रिया सुळे : 2.2%

सांगता येत नाही  : 11.5%

------------------------------------------

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कामगिरीबद्दल समाधानी आहात का?

खूप समाधानकारक : 25.5%

काही प्रमाणात समाधानकारक : 31.9%

मुळीच समाधानकारक नाही : 41.1%

सांगता येत नाही  : 1.5%

------------------------------------------

राज्य सरकारची कामगिरी कशी वाटते?

खूप समाधानकारक : 22.1%

काही प्रमाणात समाधानकारक : 36.4%

मुळीच समाधानकारक नाही : 40.3%

सांगता येत नाही : 1.2%

------------------------------------------

नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून कसं काम केलंय?

खूप समाधानकारक :  33.1%

काही प्रमाणात समाधानकारक : 31.4%

मुळीच समाधानकारक नाही : 35%

सांगता येत नाही : 0.5%

 ------------------------------------------

पुढचा पंतप्रधान म्हणून तुमची पसंती कुणाला?

नरेंद्र मोदी :   47.1%

राहुल गांधी :  17.6%

शरद पवार : 13.8%

मनमोहन सिंह : 3.8%

सोनिया गांधी  : 3%

इतर : 6.5%

सांगू शकत नाही : 8.2%

------------------------------------------

पाणी टंचाई दूर करण्यात जलयुक्त शिवारची मदत झाली का?

होय :  48.7%

नाही : 43.6 %

सांगता येत नाही : 7.7%

 ------------------------------------------

कर्जमुक्ती योजनेचा शेतकऱ्यांना खरंच लाभ झालाय?

होय  : 36.7 %

नाही : 56.7%

सांगता येत नाही :  6.5%

 ------------------------------------------

विद्यमान सरकार मराठा समाजाला खरंच आरक्षण देईल?

होय :   26.6%

नाही : 61.5%

सांगता येत नाही :  11.9%

 ------------------------------------------

आंबेडकर-ओवेसी एकत्र आल्यानं दलित-मुस्लिम मतांचं ध्रुविकरण होऊन भाजपाला फायदा होईल का?

होय :  49.5%

नाही :  43.6%

सांगता येत नाही : 6.9%

------------------------------------------

काँग्रेस - राष्ट्रवादी महाआघाडीनं मनसेला सोबत घ्यावं का?

होय :  46.3%

नाही :  48.1%

सांगता येत नाही :  5.6%

------------------------------------------