नवी दिल्ली : अख्खं जग कोरोनाशी लढत आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशातच कोरोनाच्या जन्माचं केंद्र असलेल्या चीनच्या कुरापती थांबायचं काही नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी लॉकडाऊनदरम्यान चीनने पुन्हा एकदा भारतीय सीमा ओलांडली होती. त्यानंतर भारतीय हवाई दलाने त्यांना चोख प्रत्युत्तर देत माघारी धाडलं होतं. तसेच पाकिस्तानकडून दहशतवादाला देण्यात येणारं प्रोत्साहन आणि भारताकडून सुरक्षा क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी एबीपी न्यूजला एक्स्ल्युझिव्ह मुलाखत दिली. त्यादरम्यान, त्यांनी अनेक मुद्दांवर चर्चा केली.


सध्या संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे, तर भारतीय सैन्य सीमेवर शत्रुंशी लढा देत आहे. मग ती एल. ओ. सी असो किंवा काश्मीरमधील दहशतवाद. गेल्या एक आठवड्यापासूनचीनच्या सीमेवर जे झालं ते खरचं तणाव वाढवणारं आहे. आधी लडाखमध्ये आणि त्यानंतर सिक्किममध्ये भारतीय सैन्य आणि चीनी सैन्य एकमेकांसमोर आलं. चिनी लष्करी हेलिकॉप्टर्स भारतीय हद्दीत घिरट्या घालताना दिसली होती. त्यावेळीसुद्धा भारतीय हवाई क्षेत्राचे त्यांनी उल्लंघन केले होते. यासंदर्भात बोलताना लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी सांगितले की, 'चिनी सैन्यासोबत भारतीय सैन्याचे फेस ऑफ यााधीही अनेकदा झाले आहेत. या गोष्टींशी संघर्ष करण्यासाठी काही प्रोटोकॉल आहेत. आम्ही स्थानिक कमांडर्स आणि सैन्य डेलिगेशन लेव्हलवर चर्चा करतो आणि त्यांना सामोरे जातो. काही दिवसांपूर्वी लडाख आणि सिक्किममध्ये जे काही एकाच वेळी झालं. हा निव्वळ योगायोग आहे. यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर यामध्ये लक्षं न घातलेलं बरं. हे नेहमी सुरूच असतं. कारण त्यांचे सैनिकही बॉर्डरवर तैनात आहे आणि आपलेही. अशातच पेट्रोलिंग दरम्यान, दोन्ही देशांचे सैनिक एकमेकांसमोर येत असतात.'


कोरोना व्हायरसचा जन्म चीनमध्ये झाला आहे. तसेच असं मानलं जात आहे की, कोरोनाच्या महामारीनंतर जी वर्ल्ड ऑर्डर असेल त्यामध्ये चीनचा अत्यंत आक्रमक व्यवहार पाहायला मिळू शकतो. अशा परिस्थितीत भारताला सावध राहण्याची गरज आहे, असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे म्हणाले की, 'तुम्हाला माहिती आहे, आपली पश्चिम सीमा पाकिस्तानच्या बाजूला आहे आणि दुसरी उत्तर सीमा चीनच्या बाजूला आहे. अशातच आपल्याला चारही बाजूंना लक्षं द्यावं लागतं. आमची तयारी आहे. ज्या काही घटना दोन्ही सीमांवर घडतात, त्यावर आमची बारीक नजर असते. त्यानुसार, आम्ही आमची रणनिती आखतो, जेणेकरून आमचं कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडता येईल.'


सध्या काश्मीरमध्ये दहशतवाद वाढताना दिसून येत आहे. कलम 370 हटवल्यानंतर काही महिन्यांपर्यंत काश्मीर खोऱ्यात शांतता पाहायला मिळाली. परंतु, काही महिन्यांतच पुन्हा दहशतवादी घटानांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. या घटनांमुळे भारतीय सैन्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. हंडवारा एनकाउंटरमध्ये कमांडिंग ऑफिसर आणि मेजर यांच्यासह पाच जवान शहीद झाले, काश्मीरमध्ये दहशतवाद पुन्हा परतला आहे किंवा उन्हाळ्यात दहशतवादाच्या घटना वाढता, असं तुम्हाला वाटतं का? यावर बोलताना एम. एम. नरवणे म्हणाले की, 'थंडीच्या दिवसांत सीमेवर थोडी शांतता असते. परंतु, हा दरवर्षीचा पॅटर्न आहे. जसा बर्फ वितळतो. तशा एलओसीवर दहशतवादी घटना वाढताना दिसून येतात. परंतु, यासाठीही आमची काही रणनीती असते, त्याअंतर्गत आम्ही सीआय-सीटी ग्रिड म्हणजेच, काउंटर-इनसर्जेसी अँड काउंटर टेरेरिज्म ग्रिडमध्ये बदल करत असतो. याचा परिणाम असा झाला की, जे दोने-तीन एक्नाउंटर झाले, त्यावेळी आपण त्यांना पकडू शकलो. मग एलओसीवर असो किंवा खोऱ्यात, आम्हाला त्यांना पकडण्यात यश मिळालं. दहशतवादी कमांडरला कंठस्नान घातलं. हे तर होतच राहणार. परंतु, दहशतवादाबाबत बोलायचं झालं, तर नक्की सुधारणा होईल.'


पुढे बोलताना एम. एम. नरवणे यांना काश्मिरमध्ये दहशतवाद वाढण्यासाठी कोण जबाबदार आहे, यासंदर्भात विचारण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले की, 'दहशतवाद वाढविण्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे, यामध्ये काहीच दुमत नाही. दहशतवाद सीमेपलिकडूनच येत आहे. एलओसीच्या पलिकडे 10 ते 12 दहशतवादी कॅम्प आहेत. तिथून दहशतवादी सीमा पार करण्याच्या प्रयत्नात असतात. जम्मू आणि कश्मीरमध्ये दहशतवादी घटना घडवण्याचा त्यांचा कट असतो. परंतु, जसं मी सांगितलं की, आमची या सर्व घटनांवर बारिक नजर आहे. आम्ही त्यांचा कोणताच हेतू साध्य होऊ देणार नाही.'


मंगळावारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं, त्यावेळी त्यांनी देशाला 'आत्मनिर्भर' होण्याचं आवाहन केलं आहे. परंतु, भारतीय सैन्य आत्मनिर्भर कसं बनणार, कारण आपल्या देशात हत्यारं आयात केली जातात. जगभरातील इतर देशांपैकी आपला देश हत्यारं आयात करण्यामध्ये अग्रेसर आहे. अशातच आपला देश चीन, पाकिस्तान आणि काश्मीरमधील दहशतवादाशी लढत आहे. यावर बोलताना एम. एम. नरवणे म्हणाले की, 'आपण मेक इन इंडियाचं समर्थन करत आहोत. जेणेकरून सुरक्षा क्षेत्रातही आपल्याला आत्मनिर्भर बनता येईल. मी तुम्हाला सांगू शकतो की, 'इंडियन आर्मीचे आवश्यक सामानांसाठी जे ऑर्डर्स आहेत. त्यातील 70 ते 75 टक्के भारतीय कंपन्यांनाच देण्यात आले आहेत. त्यामुळे आपण मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भरतेवर नेहमीच लक्षं देतो.'