Oman Boat Case : पगार न मिळाल्याने नाराज होऊन ओमानमध्ये काम करणाऱ्या तीन भारतीयांनी भारतात पलायन केले. देशात परतण्यासाठी त्यांनी थेट सागरी मार्ग निवडला आणि एक बोट चोरली. चोरलेल्या बोटीने 3000 किमीचा प्रवासही केला होता, परंतु 6 दिवसांनंतर त्यांना कर्नाटकच्या उडुपी किनाऱ्याजवळ भारतीय तटरक्षक दलाने पकडले. तिघांनाही सोमवारी उडुपी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या घटनेची माहिती आता समोर आली आहे.

ओमान कंपनीने पासपोर्ट जप्त केल्यावर बोटीसह पलायन 

जेम्स फ्रँकलिन मोझेस (50), रॉबिन्सन (50) आणि डेरोस अल्फोन्सो (38) हे तामिळनाडूचे रहिवासी आहेत. तिघेही ओमानमधील एका मासेमारी कंपनीत काम करत होते. येथे त्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने त्यांचा छळ होत होता. अशा परिस्थितीत तिघांनीही घरी परतण्याचा निर्णय घेतला, पण, ओमानी कंपनीने या लोकांचे पासपोर्ट जप्त केले होते, त्यामुळे त्यांना मायदेशी परतण्यासाठी सागरी मार्गाशिवाय दुसरा मार्ग नव्हता. मासेमारी बोट घेऊन तिघे पळून गेले.

भारतीय हद्दीत घुसल्यावर एका मच्छिमाराने पोलिसांना सांगितले

17 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता तिघांनी ओमानच्या पूर्वेकडील दुकम बंदर सोडले. 6 दिवसांच्या प्रवासानंतर त्यांनी 23 फेब्रुवारी रोजी सेंट मेरी बेट, उडुपीजवळ बोटीने भारतीय हद्दीत प्रवेश केला. ओमानी बोट पाहून स्थानिक मच्छिमाराने किनारी सुरक्षा पोलिसांना याबाबत माहिती दिली.

जीपीएस उपकरणाच्या मदतीने 3000 किमीचा प्रवास केला

याची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दल आणि तटीय सुरक्षा पोलिसांनी तिघांनाही सेंट मेरी आयलँडजवळ दुपारी साडेचारच्या सुमारास पकडले. सर्वांवर पासपोर्ट कायदा 1920 च्या कलम 3 आणि भारतीय सागरी क्षेत्र कायदा 1981 च्या कलम 10, 11 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत हे लोक केवळ जीपीएस यंत्राच्या साहाय्याने सुमारे तीन हजार किलोमीटरचा सागरी प्रवास करून कारवार किनाऱ्यामार्गे सेंट मेरी बेटावर पोहोचल्याचे समोर आले. कोस्टल सिक्युरिटी पोलिस एसपी मिथुन एचएन यांनी या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा दहशतवादी अँगल नसल्याचे म्हटले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या