नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर देशभरातील नागरिक चांगले आणि वाईट असे दोन्ही परिणाम भोगावे लागत असल्याचं सांगत आहेत. मात्र दोन महिन्यांत देशात तब्बल 40 लाख जणांनी रोजगार गमावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


असोचेम या कॉमर्स इंडस्ट्रीतल्या सर्वात जुन्या आणि सर्वात विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या संस्थेने एक सर्वेक्षण केलं होतं. असोचेमचे अध्यक्ष डी एस रावत यांच्याशी बातचित करताना ही धक्कादायक आकडेवारी समोर आली. हा अहवाल सरकारकडे सोपवला आहे, त्याची गंभीर दखल घेतली जाईल, अशी आशा रावत यांनी व्यक्त केली.

परिवहन, बांधकाम आणि स्थानिक पर्यटन क्षेत्रांना नोटाबंदीच्या निर्णयाचा मोठा फटका बसला आहे. ही स्थिती पूर्ववत करण्यासाठी, नागरिकांना दिलासा वाटेल असं वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारनं बजेटमध्ये पावलं उचलली पाहिजेत, असं मत व्यक्त केलं जात आहे.