जम्मू-काश्मीर: जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामानं सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. हे तीनही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे असल्याची माहिती समजते. काल रात्रीपासून दहशतवादी गोळीबार करत होते. अखेर आज (गुरुवार) सकाळी तीनही दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं.


या दहशतवाद्यांकडून तीन एके-47 रायफल आणि मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. माजिद मीर, शाकिर आणि शाबिर अहमद अशी ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांची नावं आहेत. सध्या या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. एकीकडे गोळीबार सुरु असताना दुसरीकडे येथील काही नागरिकांनी दगडफेक करुन या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान यामध्ये लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे.

दरम्यान काल, (बुधवार) सकाळी काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यातील रफियाबाद परिसरातही दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होतं. लष्कराच्या अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी गावातील एका घरामध्ये लपले होते. त्यावेळी त्यांना घेराव घालण्यात आला. दरम्यान, त्यांच्याकडून जोरदार गोळीबार करण्यात आला. यावेळी लष्कराच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात दोघंही दहशतवादी ठार झाले.