पणजी : पर्यटनासाठी गोव्यातील कळंगुट बीचवर आलेल्या 14 जणांच्या ग्रुपपैकी पाच जण बुडाले. त्यापैकी तिघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा शोध सुरु आहे. सर्व मृत अकोल्यातील विठ्ठलनगरमधल्या मोठी उंब्रीचे रहिवासी होते.


अकोल्यातील 14 जणांचा ग्रुप आज पहाटे रेल्वेने गोव्याला आला होता. पहाटे चारच्या सुमारास मारगोवा स्टेशनवर ते उतरले. त्यानंतर टॅक्सीने कळंगुट बीचवर सकाळी सहाच्या सुमारास ते पोहोचले.

कळंगुट बीचवर पोहोचताच सगळे 14 जण समुद्रात उतरले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने पाच जण आत ओढले गेले. तर उर्वरित नऊ जण सुखरुप किनाऱ्यावर पोहोचले. जवळपास 20 मिनिटांनी तिघांचे मृतदेह समुद्रकिनाऱ्यावर सापडले.

मृतांमध्ये दोन भावांचा समावेश आहे. त्यापैकी एक जण पोलिस शिपाई आहे. प्रीतेश लंकेश्वरनंदा गवळी (वय 32 वर्ष, पोलिस शिपाई), चेतन लंकेश्वरनंदा गवळी (वय 27 वर्ष, विद्यार्थी), उज्ज्वल प्रकाश वाकोडे (वय 25 वर्ष, मेकॅनिक) अशी मृतांची नावं आहेत.

तर किरण ओमप्रकाश म्हस्के आणि शुभम गजानन वैद्य हे दोघे बेपत्ता आहेत. लाईफ गार्ड्सच्या मदतीने पोलिस समुद्रात या दोघांचा शोध घेत आहेत.