Gondia News : गोंदिया जिल्ह्यात तापमानाचा पारा 44 ते 45 अंशावर गेला आहे. अशातच अर्जुनी मोरगाव तालुक्यातील देवलगाव येथील शेतमजुराचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विनोद राऊत (वय 38), रा. देवलगाव, ता. अर्जुनी मोरगाव असे मृतक मजुराचे नाव आहे. अति उष्णतेमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर खरं कारण समोर येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांची दिली आहे. 

Continues below advertisement

गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 44 ते 45 अंशांवर 

गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 44 ते 45 अंशांवर आला असल्याने नागरिकांसह शेतमजुरांवर उष्णतेचा मोठा परिणाम होत आहे. विनोद राऊत हे रोजंदारीवर शेतमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सध्या रब्बी हंगामातील धान पिकाची कापणी व बांधणीची कामे युद्धपातळीवर सुरू असल्याने आज सकाळी एका शेतकऱ्याकडे कामासाठी गेले होते. कडक उन्हात काम करत असताना त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांनी घरी जातो म्हणून निघून आले; मात्र गावात येताच रस्त्याच्या कडेला कोसळले. परिसरात फारशी वर्दळ नसल्यामुळे सुरुवातीला ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. बराच वेळ ते उन्हात पडून राहिल्याने त्यांची प्रकृती आणखी गंभीर झाली स्थानिक आश्रम शाळेतील अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या वैशाली जांभुळकर यांनी मृतक पडलेला दिसून येताच माणुसकीचा धर्म जपत तातडीने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, नवेगावबांध येथे आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. 

प्राथमिक वैद्यकीय तपासणी नंतर अती उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची शक्यता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लोथे यांनी व्यक्त केली आहे. तर शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं खरं कारण समोर येईल असे त्यांनी सांगितले.

Continues below advertisement

नागरिकांनी पुढील 2 ते 3 दिवस विशेष काळजी घेण्याची गरज, हवामान विभागाचा इशारा

अकोला आणि नंदुरबार जिल्ह्याचे तापमान 45.3 अंशाच्या पुढे आहे. सद्या राज्यातील बहुतांश जिल्ह्याचे तापमान 40 च्या पुढे आहे. नागरिकांनी पुढील 2 ते 3 दिवस विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे पुणे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुढील 5 दिवसात पावसाची शक्यता नसल्याने तापमान घटण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.  दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसात विदर्भात तापमानात मोठी वाढ होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे