गोंदिया :  एकेकाळी नक्षल (Naxal) चळवळीचा एक भाग असलेली 19 वर्षांची आदिवासी मुलगी आता हिंसाचाराने भरलेल्या त्या जीवनापासून काही मैल दूर झाली आहे.  आता शिक्षणाचे धडे गिरवत आहे. तिने नुकतीच HSC ची परीक्षा उत्तीर्ण केली असून भविष्यात पोलीस दलात सामील होऊन कायद्याच्या उजव्या बाजूने काम करायचे आहे. 


पोलिसांनी केली पळून जाण्यास मदत


गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील दुर्गम लव्हारी गावातील राजुला रवेलसिंग हिदामी असे या मुलीचे नाव आहे. राजुला हिला जबरदस्तीने पळवून नेऊन नक्षलांच्या छावणीत भरती करण्यात आले. तिथे तिला बंदुकीचे धडे देण्यात आले. कोरची- कुरखेडा- खोब्रामेंढा दलमसह तिच्या दोन वर्षांच्या सहवासात बंडखोरांनी तिला शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले. ती सुरक्षा दलांशी भीषण बंदुकीच्या लढाईत सामील होती. ही तरुणी शस्त्र सोडू पाहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांच्या गुप्तचर शाखेला मिळाली आणि त्यामुळे पोलिसांनी तिला पळून जाण्यास मदत केली. 


बारावीत 45.83 टक्के गुणांसह उत्तीर्ण


राजुलाने तत्कालीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप आठोळे यांच्यासमोर आत्मसमर्पण केले. आठोळे यांनी तिचे पालकत्व स्वीकारले आणि तत्कालीन आयटीडीपीओ प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांच्या मदतीने तिला आदिवासी निवासी शाळेत दाखल केले. नक्षलवाद्यांमध्ये सामील होण्यापूर्वी राजुलाने इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. 2018 मध्ये इयत्ता आठवीमध्ये प्रवेश घ्यायचा होता. आठोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन एसपी हरीश बैजल, एपीआय कमलेश बच्चव, पीएसआय चंद्रहास पाटील हेडकॉन्स्टेबल ओमप्रकाश जामनिक, चंद्रशेखर गणवीर आणि रमेश मोहुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली राजुलाने 2021 साली मध्ये दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आणि आता ती बारावीत देखील 45.83 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाली आहे. 


उत्तीर्ण झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार


राजुलाला पोलीस दलात भरती व्हायचे आहे. कारण तिला शिक्षणाचे महत्त्व पटले आहे. आज गोंदियाचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी राजुला हिदामीचे बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. 


गेल्या 12 वर्षात नक्षलवादी हिंसाचारात 77 टक्क्यांची घट


 गेल्या 12 वर्षांमध्ये भारतातील नक्षलवादी हिंसाचारात (Naxal violence ) तब्बल 77  टक्क्यांची घट झाली आहे. शिवाय नक्षली हिंसाचारात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील गेल्या 12 वर्षाच्या कालावधीत 90 टक्क्यांनी घटली आहे. एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी माहिती दिली


हे ही वाचा :