Ganpati Visarjan 2022 : राज्यात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. आज गौरी-गणपती विसर्जन आहे. सहा दिवसांचा पाहुणचार घेऊन गौराईसह लाडका बाप्पा आज निरोप घेणार आहे. यंदा कोरोनाचे निर्बंध हटल्याने मोठ्या धूमधडाक्यात गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडूनही चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आज गौरी-गणपती विसर्जनासाठी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर पालिकेनं जय्यत तयारी केली आहे. तसेच पुणे, नाशिक या शहरांमध्येही पालिकेकडून तलाव आणि कृत्रिम तलाव उभारत विसर्जनासाठी सोय करण्यात आली आहे. आज गणपती विसर्जनासाठी मोठी गर्दी उसळण्याची शक्यता पाहता पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे.


यावेळी घरोघरी गौराईंचे उत्साहात स्वागत करण्यात आले. माहेरवाशीण गौराईचं रविवारी आवाहन झालं. त्यानंतर आज गौरी-गणपतीचं विसर्जन होणार आहे. जड अंत:करणानं गणेशभक्त लाडक्य बाप्पासह गौरीईला निरोप देतील. गौरी-गणपतीच्या आगमनासाठी भाविक अगदी महिनाभर आधीपासून तयारी सुरु करतात. सजावटीसाठी गणेशभक्त खूप मेहनत घेतात. त्यानंतर जेव्हा लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ येते. तेव्हा मात्र प्रत्येक गणेशभक्ताचे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. 


गौरी विसर्जनाचा मुहूर्त


शनिवारी 3 सप्टेंबर रोजी गौराईचं सोनं पावलांनी आगमन झालं. रविवारी गौरी आवाहन पार पडलं. माहेरवाशीण गौराईला पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवत तिची विधीवत पूजा करण्यात आली. त्यानंतर आज 05 सप्टेंबर रोजी सोमवारी गौराईचं विसर्जन होणार आहे. गौरी विसर्जनासाठी सकाळी सहा वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंतचा मुहूर्त आहे. यादरम्यान भक्तगण आपल्या सोयीनुसार गौरी विसर्जन करु शकतात.


आज मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी


राज्यासह मुंबईत देखील मोठ्या उत्साहात गणेशोत्सवात साजरा केला जात आहे. आज 05 सप्टेंबर रोजी गौरी - गणपतीचे विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये भाजीपाला, दूध, ब्रेड आणि बेकरी पदार्थ वाहून नेणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीन टँकर्स तसेच रुग्णवाहिका, शासकीय आणि निमशासकीय वाहने, स्कूल बस यांना सूट देण्यात आली आहे. परंतु, इतर जड वाहनांना या दिवशी मुंबईत प्रवेश करता येणार नाही. विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा, तसेच विसर्जनावेळी मुंबईत कोणत्या ही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबईत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.