लासलगाव बाजार समिती ओस, 100 कोटींहून अधिकची उलाढाल ठप्प
एबीपी माझा वेब टीम | 06 Jun 2017 11:57 AM (IST)
नाशिक : शेतकरी संपामुळे केवळ भाजीपाला महागला आहे, तर दुसरीकडे ग्रामीण अर्थकारण संकटात सापडलं आहे. शेतकरी संपामुळे आशियातली सर्वात मोठी कांदा बाजार समिती असलेली लासलगाव बाजार समिती ओस पडली आहे. दररोज होणारी हजारो क्विंटल कांद्याची आवक आणि करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यात संपामुळे 100 कोटींपेक्षा जास्तची उलाढाल थांबली आहे. शेतकरीच नाही तर हमाल, मापारी, वाहनचालकांची रोजनदारी बुडाली आहे. जिल्ह्यातल्या 17 मोठ्या बाजार समित्या आणि 20 उपबाजार समित्यांमध्ये रोज होणारा 20 ते 25 कोटींचा भाजीपाला, कांदे व्यापार ठप्प झाला आहे. भविष्यात निर्यातीवर आणि भावांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सतरा नेत्यांशी चर्चा करण्यापेक्षा सरकारने लोकप्रतिनिधीशी चर्चा करून प्रश्न निकाली काढावा.स संघटना प्रश्न मांडणार असतील तर लोकप्रतिनिधी कशासाठी आहेत?, असा थेट सल्ला आशियातल्या सर्वात मोठ्या कांदा बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी दिला आहे.