धुळे : राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित (VijayKumar Gavit) आपल्या वादग्रस्त विधानामुळे चांगलेच चर्चेत आलेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मासे खाल्ल्याने स्त्रियांचे सौंदर्य खुलते तसेच डोळे सुंदर होतात आणि त्यामुळे मुली लवकर पटतात असा जावईशोध विजयकुमार गावित यांनी लावला आहे. धुळ्यातील (Dhule News) आदिवासी विकास विभागाच्या कार्यक्रमात त्यांनी महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 


राज्याच्या राजकीय वर्तुळात दररोज काहीतरी नवीन घडामोडी घडताना दिसतात. यामध्ये बहुतांश वेळा विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. सरकारमधील भाजपाचे मंत्री विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी मासे खाल्ल्यानंतर  डोळे सुंदर होतात आणि त्यामुळे मुली लवकर पटतात असा जावईशोध लावला आहे. हे बोलत असताना अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्याबद्दल त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.  ऐश्वर्या राय मासे खायची म्हणून तिची त्वचा आणि डोळे सुंदर आहे, असं विजय कुमार गावित यांनी म्हटलं आहे.


आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित म्हणाले, “मासे खाल्ल्याने दोन फायदे मिळतात. मासे खाल्ल्यावर स्त्रिया सुंदर दिसतात. त्याचबरोबर नियमित मासे खाल्ल्याने डोळ्याचे सौंदर्य वाढते. ऐश्वर्या राय समुद्राच्या किनारी राहणारी आहे.ती बंगळूरुची आहे. ऐश्वर्या राय दररोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे एवढे सुंदर आहे. तुम्ही देखील दररोज मासे खाल्ले तर तुमचे डोळे देखील तिच्यासारखे सुंदर होऊ शकतात. माशांमध्ये एक प्रकारचं ऑईल असतं. त्यामुळे डोळे आणि त्वचा चांगली राहते.”


दरम्यान, धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मच्छीमार बांधवांना मासेमारीचं साहित्य वाटप करण्यात आलं आहे. कार्यक्रमाला आदिवासी मंत्री विजय कुमार गावित देखील उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये बोलत असताना विजयकुमार गावित यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


(विजयकुमार गावितांचे वक्तव्य आम्ही शब्दश: वापरु शकत नाही... विजयकुमार गावितांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ आम्ही या बातमीसह जोडत आहे.)