Lumpy Skin Disease : लम्पी स्कीन आजारामुळं (Lumpy Skin Disease) पशुपलाक चिंतेत आहे. अशातच धुळे जिल्ह्यातून एक दिलासादायकत बातमी समोर आली आहे. धुळे जिल्ह्यात लम्पी स्कीन आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. जिल्ह्यातील 2 हजार 588 जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत. गेल्या दोन महिन्यापूर्वी लम्पी आजारामुळे अनेक जनावरांचा जीव धोक्यात आला होता. मात्र, आता त्यावर नियंत्रण आणण्यात यश आलं आहे. दरम्यान, आत्तापर्यंत धुळे जिल्ह्यात लम्पीमुळं 131 जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे.


कृषी उत्पन्न बाजार समितीत होणारी गुरांची वाहतूक बंद


संपूर्ण राज्यात गेल्या काही दिवसांपासून लम्पी आजाराचा धोका वाढत असल्याचे चित्र आहे. या आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. धुळे जिल्ह्यातही लम्पीचा धोका वाढला होता. मात्र, त्यावर आता नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. जिल्ह्यातील 2 हजार 588 जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत. लम्पीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत होणारी गुरांची वाहतूक बंद करण्यात आली होती. तसेच खरेदी आणि विक्री देखील बंद करण्यात आली होती. यामुळं कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. धुळे जिल्ह्यात देखील गेल्या दोन महिन्यांपूर्वी या आजाराने थैमान घातले होते. जिल्ह्यातील जवळपास 2 हजार 700 गोवंशीय जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली होती.


37 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प 


धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत होणारी गुरांची खरेदी विक्री बंद करण्यात आल्याने जवळपास 37 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. मात्र, पशुसंवर्धन विभागाने तत्काळ उपायोजना करत जनावरांच्या लसीकरणासह विविध उपाययोजना राबवल्यामुळं जिल्ह्यात लम्पी आजाराला आटोक्यात आणण्यात पशुसंवर्धन विभागाला यश आले आहे. जिल्ह्यातील 2 हजार 558 जनावरे लंपी मुक्त झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात साडेतीन लाख जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच या आजारामुळे जिल्ह्यात आत्तापर्यंत 131 जनावरांचा मृत्यू झाला आहे.


आत्तापर्यंत 43 गायी, 70 बैल आणि 18 वासरांचा मृत्यू


धुळे जिल्ह्यात 26 जुलै 2022 रोजी या आजाराचा शिरकाव झाला होता. सुरुवातीला फक्त धुळे तालुक्यात असलेल्या या आजाराने संपूर्ण जिल्ह्यात शिरकाव करण्यास सुरुवात केली होती. जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या 131 जनावरांमध्ये 43 गायी, 70 बैल आणि 18 वासरांचा समावेश आहे. लम्पी आजारामुळे मृत्यू झालेल्या पशुपालकांना  अनुदान देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. त्यानुसार आत्तापर्यंत जिल्ह्यातील 94 पशुपालकांना अनुदान प्राप्त झाले आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Aurangabad: कृषिमंत्र्यांच्या तालुक्यात लम्पीचा कहर, जिल्ह्यात सर्वाधिक जनावरे सिल्लोड तालुक्यात दगावली