धाराशिव : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे मनोज जरांगे (Manoj Jarange) आजपासून पुन्हा राज्याचा दौरा करत आहे. दरम्यान, पहिल्याच दिवशी जरांगे यांची धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील वाशी येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलतांना जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. "मराठा समाजाला त्यांचे हक्काचे आरक्षण देण्यात यावे, आमच्या नादाला लागू नका. मला अडचणीत आणण्याचे प्रयत्न केला जातो, पण मी मरायला भीत नाही. तसेच, मला मारल्यावर हा आग्या मोहोळ तुमचं काय करेल, असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. 


वाशी येथील सभेत बोलतांना जरांगे म्हणाले की, "मी कुठे अडचणीत सापडतो का? याची खात्री सरकारने केली. पण माझ्याकडे आहे तरी काय, सिमेंटचे पत्रे ज्याला कोणी भंगारमध्ये सुद्धा घेत नाही. बँडमध्ये खुळखुळा वाजवणारा सारखा मी दिसतो. तुम्ही माझं काय करणार, मी मरायला देखील भीत नाही. मला मारल्यावर हे आग्या मोहोळ तुमचं काय करेल. त्यामुळे आमच्या नादाला लागू नका. आमची एकच विनंती आहे आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळाले पाहिजे," असे जरांगे म्हणाले. 


बॅनर काय तुझ्या बापाचा होता


आमच्या भोकरदनच्या नेत्याने आम्ही लावलेला गाव बंदीचा बॅनर फाडला. मला गावात यायचं आहे, त्यामुळे बॅनर काढा असे हा नेता म्हाणाला होता. पण, बॅनर काय तुझ्या बापाचा होता. मराठ्यांच्या पोरांनी लावलेलं बॅनर काढलं आणि त्यांना मारहाण देखील केली. त्या नेत्याची मजा येणार आहे, थोडं दिवस थांब म्हणावं, एकदा आम्हाला आरक्षण मिळू द्या. आरक्षणामुळे आम्ही देखील शांत आहोत. एकदा आम्हाला आरक्षण मिळू दे, तुझी गाठ आमच्यासोबतच आहे असे जरांगे म्हणाले. 


'जो आमचा, आम्ही त्याचे'


आणखी काही दिवस झुंजाची वेळ आली तरीही चालेल, असं घराघरातील मराठ्यांनी ठरवलं आहे. सामान्य मराठा देखील या आंदोलनात उतरला आहे. मराठा समाजाने जे नाही त्या लोकांना मोठं केलं आहे. नेत्यांचे स्टीकर चिटकवले, त्यांचे बॅनर बांधले. लेकरांना भविष्यात मदत करतील म्हणून आपल्या बाप जाद्यांनी या नेत्यांना मोठं केलं. 70 वर्षात सर्वच पक्षातील नेत्यांना मराठ्यांनी मोठं केलं. कधीकाळी आपल्या लेकरांना मदतीला येईल म्हणून मराठ्यांनी यांना ताकदीने मोठं केलं. पण ज्यांना तुम्ही मोठं केलं तेच नेते आज मराठा आरक्षणाच्या विरोधात उतरले आहे. रात्र दिवस मेहनत करून यांच्यावर मराठ्यांनी गुलाल टाकला. पण, आज आमचे लेकरं मोठं करण्याची वेळ आल्यावर हे  विरोध करायला लागले. त्यामुळे आज खरा मराठा जागा झाला आहे. जो आमचा, आम्ही त्याचे असं मराठ्यांनी ठरवलं आहे. अन्यथा आमच्या गावात उभं राहायचं नाही, असेही जरांगे म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange : निष्पाप मुलांना फसवू नका, उद्यापासून 'ती' कारवाई बंद करा; जरांगे थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात धडकले