नागपूर:  या वर्षातील आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या पालख्या, तसेच भविका व वारकऱ्यांच्या वाहनांना टोल सवलतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी नागपुरहून जाणाऱ्या वाहनांसाठी विशेष स्टीकर्सचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी अमरावती मार्गावरील शहर आरटीओ कार्यालयात (MH 31) येथे तळ मजल्यावर स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.


पंढरपूरला जातेवेळी व परत पंढरहूहून येते वेळी म्हणजेच 7 ते 15 जुलै या कालावधीसाठी ज्या वाहनांमधून पालख्या, भाविक व वारकरी जाणार आहेत अशा वाहनांना पथकरातून सुट मिळण्यासाठी स्टिकर्स परिवहन विभागाकडून जारी करण्यात येणार आहे. यासाठी भाविकांना आपल्या वाहनाच्या वैध कागदपत्रांसोबत अर्ज करता येईल. त्यांना टोल सवलत स्टीकर्स देण्यात येणार आहे. पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांनी व वारकऱ्यांनी पथकरातून सुट मिळविण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर (शहर)  यांचेकडे सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत संपर्क साधावा, असे प्रादेशिक परिवाहन अधिकारी रविंद्र भुयार यांनी कळविले आहे.


अधिकाऱ्यांची नियुक्ती


नागपूर आरटीओ कार्यालयात सकाळी 9 ते दुपारी 3 आणि दुपारी 3 रात्री 10 दरम्यान अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात सहायक मोटर वाहन निरीक्षक दर्जाचे अधिकारी या कक्षात अर्जदारांची पडताळणी करतील आणि पास जारी करणार आहे.


हे कागदपत्र सोबत बाळगाः आरटीओ


नागरिकांच्या सोयीसाठी नागपूर शहर कार्यालयात या कक्षाची विशेष स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांनी सकाळी 9 ते रात्री 10 पर्यंत कधीही आपल्या वाहनाच्या वैध कागदपत्रे आणि आपण जाणार आणि येणार यासंदर्भातील पुरावे पाससाठी येताना सोबत बाळगावे. यात किती जण प्रवास करणार आणि कोणत्या तारखेला याची माहिती असणे गरजेचे असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.


इतर महत्वाच्या बातम्या


Ashadhi Ekadashi 2022 : माझा विठ्ठल माझी वारी, दिसू लागली विठुरायाची पंढरी : Abp Majha


Ashadhi Ekadashi: वारकर्‍यांसाठी सातशे महिलांनी बनविले 65 हजार लाडू; अकरा वर्षांची परंपरा कायम