Maharashtra Politics : ज्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं, ज्या मुद्द्यावरुन शिवसेनेत फूट पडली, त्याच विकास निधीच्या मुद्द्यावरुन आता पुन्हा एकदा सरकारमधील तीनही पक्षाचे नेते आमने सामने येताना पाहायला मिळत आहेत. निधी मिळत नसल्याने औरंगाबादमध्ये (Aurangabad) शिंदे ठाकरे गटाचा वाद पाहायला मिळाला, तर दुसरीकडे जालन्यातील (Jalna) शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निधी मिळत नसल्याचं म्हणत भाजप नेते आणि पालकमंत्री अतुल सावे (Atul Save) यांना घेराव घालत घोषणाबाजी केली. त्यामुळे विकास निधीच्या मुद्यावरुन सत्ताधारी तीनही पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 


जालन्यात नेमकं काय झालं? 


सोमवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, याच बैठकीवरुन शिंदे गटांनी नाराजी व्यक्त करत आपल्याला निधी देताना अन्याय केला जात असल्याचा आरोप केला. तर, विकास निधी मंजूर करत असताना शिंदे गटाच्या लोकांना डावलल्याचा आरोप करत शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब घुगे, जिल्हा संपर्कप्रमुख पंडित भुतेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पालकमंत्री सावे यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच घेराव घातला. तसेच, विकास निधी देताना आमच्यावर अन्याय होत असून, असा अन्याय आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. तसेच यावेळी शिंदे गटाकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. त्यामुळे सावे देखील चांगलेच संतापले होते. विशेष म्हणजे, मध्यस्थी करणाऱ्या भाजपचे आमदार नारायण कुचेंनाही शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खडे बोल सुनावले. 


सावे यांनी सभ्यतेची भाषा ओलांडली: खोतकर 


दरम्यान यावर शिंदे गटाचे नेते तथा आमदार अर्जुन खोतकर यांनी प्रतिकिया दिली आहे. शिवसेनेचे (शिंदे गट) पदाधिकारी पालकमंत्री सावे यांची भेट घेण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. असे व्हायला नको होते, मात्र झाले. जे घडलं त्याचं समर्थन मी करत नसलो, तरीही सभ्यतेची भाषा पालकमंत्री यांनी ओलांडली आहे. त्यामुळेच हा प्रकार घडला आहे. त्यामुळे सावे यांना असा अपमान करण्याचा काही अधिकार दिलेला नाही. सावे सातत्याने अपमान करण्याचा प्रयत्न करतात. आमचे पदाधिकारी त्यांचे हक्क मागण्यासाठी गेले होते, पण सावे यांचे असं वागणं बरं नव्हे, असे खोतकर म्हणाले.  


मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे मुद्दा मांडणार 


विकास निधी देताना दुजाभाव होत असून, याची नोंद कागदोपत्री आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दिली जाणार असल्याचं देखील अर्जुन खोतकर म्हणाले आहे. त्यामुळे आगामी काळात विकास निधीच्या मुद्यावरुन राजकीय वातावरण अधिकच तापताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा; मंत्री भुमरे-अंबादास दानवेंमध्ये थेट हमरीतुमरी