Chhatrapati Sambhaji Nagar News: मार्च महिन्यात छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) किराडपुरा भागात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर जिल्ह्यातील अनेक भागात छोट्या-मोठ्या वादाच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर शहरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलीस आयुक्त मनोज लोहिया (CP Manoj Lohia) यांनी वेगवेगळ्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणजे आता शहरात कुठेही तणावाचे वातावरण निर्माण झाल्यास तत्काळ घटनास्थळी 30 हत्यारबंद पोलिसांना पाचारण करून बंदोबस्त सज्ज ठेवण्यात येणार आहेत.  


पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले आहे की, शहरातील कोणत्याही पोलिस ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तेथील पोलिस दलाच्या मदतीला तातडीने 30 हत्यारबंद पोलिस सज्ज ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यांत स्पेशल रूम, पोलिसांच्या वाहनांमध्ये अधिकारी-कर्मचारी तैनात ठेवण्याचे नियोजन केल्याची  माहिती पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली आहे.


पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लोहिया यांनी शहरातील पोलिस दलात अनेक बदल करायला सुरवात केली आहे. तसेच वेगवेगळ्या उपाययोजनांवर देखील भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे शहर पोलीस दलातील प्रत्येक विभागप्रमुख आणि पोलीस ठाणेप्रमुख यांना विशेष मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. तसेच पोलीस अधिकारी बदलले तरीही मोबाईल क्रमांक मात्र कायम राहणार आहे. सोबतच एखादी घटना घडल्यानंतर तेथे तत्काळ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची मदत मिळणार आहे. तसेच शहरात कुठेही तणावाचे वातावरण निर्माण झाल्यास तत्काळ घटनास्थळी 30 हत्यारबंद पोलिसांना पाचारण करून बंदोबस्त सज्ज ठेवण्यात येणार आहेत. सोबतच शहरातील 34 ठिकाणी कायमस्वरूपी पोलिस तैनात असणार आहेत. त्यामुळे आता नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल, अशी अपेक्षा पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली आहे. शिवाय शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.


पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्याची चर्चा...


पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक बदल सुरु केले आहेत. सुरवातील अनेक प्राथमिक बदल केल्यावर आता पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची देखील चर्चा आहे. तसेच काही ठाणेप्रमुखांचे खांदेपालट होणार असल्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे बदल्यांचा बॉम्ब कधी फुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. तर काही अधिकारी आत्तापासूनच आपापल्या पद्धतीने 'जुगाड' लावत असल्याची देखील चर्चा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


'वन ऑफिसर, वन नंबर'; अधिकारी बदलला तरीही पोलीस ठाण्याचं नंबर तोच राहणार; छत्रपती संभाजीनगर पोलिसांची योजना