Chhatrapati Sambhaji Nagar News: रामनवमीच्या (Ram Navmi 2023) आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील किराडपुरा (Kiradpura) भागात दोन गटात तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र पोलिसांच्या कारवाईनंतर या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान या सर्व घटनेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. संभाजीनगरमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. आता तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु काही लोकं याठिकाणी भडकाऊ प्रतिक्रिया देत असून, परिस्थिती आणखी चिघळली पाहिजे यासाठी प्रयत्न करत असल्याचे फडणवीस म्हणाले आहे. 


दरम्यान छत्रपती संभाजीनगर दोन गटात झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, नेत्यांनी कसं वागलं पाहिजे हे समजावून घ्यावे. कोणीही चुकीचे स्टेटमेंट देऊ नयेत ही जबाबदारी सगळ्या नेत्यांची आहे. तसेच या घटनेला राजकीय रंग देण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यापेक्षा दुर्दैव काहीच नाही. काही जण चुकीचे बोलत आहे.  मात्र छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या परिस्थिती निंयत्रणात आहे.  परंतु शांतता पाळण्याचा प्रयत्न सर्वांना करावा लागेल. शहर शांत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. 


मध्यरात्री किराडपुरा परिसरात राडा 


छत्रपती संभाजीनगर शहराच्या नामांतराच्या महिनाभरानंतर बुधवारी मध्यरात्री मोठा तणाव निर्माण झाला. रामनवमीच्या पार्श्वभूमी राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या गटानं जयंतीसाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक सुरू केल्याने गोंधळ उडाला होता. त्यानंतर घटनेनं रौद्ररूप धारण केलं. या सर्व राड्यात पोलिसांच्या आणि खासगी मिळून 13 गाड्या जाळण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर बंदोबस्तासाठी गेलेले काही पोलीस (Aurangabad Police)  जखमी झाल्याचंही वृत्त आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहर पोलिसांनी हवेत 12 गोळ्या झाडल्या असून, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या होत्या. सद्या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून, मंदिर परिसरात शांतता आहे. 


पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु...


दरम्यान रात्री किराडपुरा भागात राडा करणाऱ्या तरुणांची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. तर सद्या या भागातील सीसीटीव्ही पोलिसांकडून तपासले जात आहे. त्यानुसार राडा करणाऱ्या सर्वच आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहित पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिली आहे. सोबतच शहरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नयेत असे आवाहन देखील पोलिसांकडून करण्यात आले आहे.  



 


इतर महत्वाच्या बातम्या:


छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत राडा; परिस्थिती नियंत्रणात, अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस आयुक्तांचं आवाहन