Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) बुधवारी मध्यरात्री दोन गटात वाद झाला होता. ज्यात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली होती. यात 15 पोलीस जखमी झाले होते. तर 16 गाड्या पेटवून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी 400 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल केले आहे. तर पोलिसांकडून आता आरोपींची धरपकड देखील करण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत 80 हल्लेखोरांची ओळख पटली असून, 28 लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त निखील गुप्ता (Nikhil Gupta) यांनी दिली आहे. 


छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरामध्ये राडा करणाऱ्या 80 दंगलखोरांची ओळख पटली असल्याची माहिती पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे. यापैकी 28 लोकांना अटक करण्यात आलेली आहे. तर सीसीटीव्हीच्या माध्यमातन या सगळ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.  तसेच अजूनही मोठे अटक सत्र होईल अशी माहिती आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे. तांत्रिक पुराव्याद्वारे शोध सुरू आहे. बरेच पुरावे आता मिळालेले आहे आणि त्यातून लवकरच या सगळ्याचा मोठा खुलासा होईल असेही निखिल गुप्ता म्हणाले आहे. 


असा घेतला जातोय आरोपींचा शोध...


छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा परिसरात बुधवारी दोन गटात वाद झाला. यावेळी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. यावेळी मोठा जमाव याठिकाणी जमा झाला होता. दरम्यान हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. तर पोलिसांकडून सर्व सीसीटीव्हीची पाहणी केली जात आहे. तसेच यातून आरोपींची ओळख पटवली जात आहे. तसेच आरोपींना पकडण्यासाठी 10 पथक नियुक्त करण्यात आले आहेत. जशीजशी आरोपींची ओळख पटत आहे, त्याप्रमाणे हे पथक त्यांना ताब्यात घेत आहे. तसेच आतापर्यंत 80 लोकांची ओळख पटली असून, 28 लोकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिली आहे. तसेच यापुढे मोठ्याप्रमाणावर आरोपींना ताब्यात घेण्यात येणार असल्याचे देखील पोलीस आयुक्त म्हणाले आहेत. 


मविआच्या सभेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त...


दरम्यान आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या सभा होत असून, दुसरीकडे भाजप आणि शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेसाठी देखील पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याची माहितीसुद्धा पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे. सोबतच सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेराद्वारे सुद्धा या दोन्ही कार्यक्रमांवर नजर ठेवणार आहे. शहरात शांतता आहे आणि दोन्ही आयोजकांनी गोंधळ होणार नाही याची हमी आम्हाला दिली असल्याचं निखिल गुप्ता यांनी सांगितलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Imtiyaz Jaleel : शहरात पुन्हा राडा घडवण्याचा प्रयत्न, 'मविआ'च्या सभेपूर्वी जलील यांचं मोठं वक्तव्य