Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावात सोमवारी दुपारच्या सुमारास जवळपास 65 मेंढ्या अचानक दगावल्या होत्या. तर 100 मेंढ्या अस्वस्थ अवस्थेत होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणात मेंढ्या मृत्युमुखी पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. तर नेमकं काय झालं म्हणून मेंढपाळ घाबरली होती. मात्र घटनेची माहिती मिळताच मंगळवारी पशुसंवर्धन जिल्हा उपआयुक्त डॉ. प्रदीप झोड तथा छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथील प्रयोग शाळा विभागीय रोग अन्वेषण डॉ. रोहित घुमाळ, सिल्लोडचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी भेट देत मेंढ्या पालन करण्याच्या मेंढपाळांची भेट घेऊन पाहणी केली. तर ॲपल बोर जास्त प्रमाणात खाल्यानेच 65 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पथकाने वर्तवला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील कासारी येथील साहेबराव मांगू शिंदे, चिंधा विठोबा तुरके, वाल्मीक दशरथ तरके साहेबराव दशरथ तुरके हे मेंढपाळ सध्या सिल्लोडच्या अंधारी शिवारात आपल्या 200 मेंढ्या घेऊन आले आहेत. दरम्यान सोमवारी अंधारी शिवारातील खराते वस्ती परिसरातील ॲपल बोरांच्या बागेत मेंढ्या चरत होत्या. परंतु, दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान अचानक मेंढ्या ओरडू लागल्या आणि एकेक करून जमिनीवर कोसळू लागल्या. अचानक झालेल्या या प्रकारामुळे सर्व मेंढपाळ घाबरले. काय करावे, काही सूचना झाले. दरम्यान याबाबत ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ अंधारी येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी उपचार केले. मात्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत किमान 50 मेंढ्यांचा मृत्यू झाला होता. तर रात्री 9 वाजेपर्यंत ही संख्या 65 पेक्षा अधिक होती.


दरम्यान याबाबत माहिती मिळताच, पशुसंवर्धन जिल्हा उपआयुक्त डॉ. प्रदीप झोड आपल्या पथकासह गावात पोहचले. यावेळी त्यांनी संबंधित मेंढपाळ यांच्याशी चर्चा करून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. सोबतच प्रयोग शाळेच्या अधिकाऱ्यांनी देखील पाहणी केली. दरम्यान ॲपल बोरांच्या बागेत मेंढ्या चरत असताना त्यांनी, मोठ्या प्रमाणात ॲपल बोर खाल्ली असावीत. त्यामुळेच मेंढ्या दगावली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पण एवढया मोठ्याप्रमाणात मेंढ्या दगावल्याने मेंढपाळ यांचं मोठं नुकसान झालं आहे.


लवकरच मदत मिळवून देण्याचे तहसीलदारांचे आश्वासन!


या घटनेची माहिती मिळताच सिल्लोडचे तहसीलदार विक्रम राजपूत, प्रभारी गटविकास दादाराव आहिरे, मंडळ अधिकारी गजेंद्र चांदे, तलाठी ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी मंगळवारी या ठिकाणी भेट देऊन सदरील घटनेचा पंचनामा केला. घटना खूप दुर्दैवी आहे, शासन स्तरावरून जी मदत मिळेल ती पाठपुरावा करून लवकरच प्राप्त करून देऊ, असे आश्वासन तहसीलदार राजपूत यांनी या वेळी दिले. तर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी अस्वस्थ असलेल्या मेंढ्याची तपासणी करून औषधोपचार केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


तब्बल 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पगार झाल्याच्या आनंदात असतानाच विचित्र अपघात; शिक्षकासह मुलाचा मृत्यू