Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे मध्यरात्री झालेल्या दोन गटांच्या वादातून शहरात अशांतता पसरवण्याची घटना घडली. दरम्यान पोलिसांनी सर्व परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून, शहरात आता शांतता आहे. मात्र यावरूनच आता राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील सुरु झाले आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या घटनेवरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी एमआयएमसह भाजपवर टीका केली आहे. या घटनेला सर्वस्वी एमआयएमसह भाजप जबाबदार असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.


छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात दोन गटांमध्ये वाद झाला. याच वादातून दगडफेक देखील झाली. दरम्यान झालेल्या घटनास्थळाची अंबादास दानवे यांनी पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर यावर बोलताना दानवे म्हणाले की, एमआयएम भाजपने मागच्या काळात दोन समाजात द्वेष रुजवण्याचा काम केलं आहे आणि त्याचा हा परिणाम आहे. छत्रपती संभाजीनगर गुण्यागोविंदाने राहण्याचा आणि विकासाच्या दृष्टीने पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. मात्र येथील वातावरण धगधगत ठेवण्याच काम हे राजकीय पक्ष करत आहेत. याबाबत मी सभागृहातही आवाज उठविला होता. या परिस्थितीबाबत पोलिसांनाही अवगत केले होते असही दानवे म्हणाले. 


पोलिसांनी समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी...


पोलिसांवर हल्ले होणं, पोलिसांचे वाहन जाळणे ही बाब निषेधार्ह आहे. त्यामुळे पोलिसांनीही अशा समाजकंटकांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे दानवे यांनी सांगितले. तर स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी हे प्रकार होत आहेत. रात्री झालेल्या घटनेला एमआयएम आणि भाजप हे पक्ष जबाबदार आहेत. मात्र जनता आता शहाणी झाली आहे, ती अशा गोष्टींना खतपाणी घालणार नाही असे म्हणत अंबादास दानवे यांनी नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहेत. 


400 ते 500 लोकांवर गुन्हे दाखल... 


दरम्यान छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात झालेल्या दोन गटाच्या वादाच्या घटनेनंतर आता पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येत आहे. शहरातील जिन्सी पोलिसात 400 ते 500 लोकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. वाद घालून शासकीय मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी हे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांनी वेगवेगळ्या आठ पथकांची नियुक्ती केली असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे राडा करणारे आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar: छत्रपती संभाजीनगर घटनेप्रकरणी 400 ते 500 लोकांवर गुन्हे दाखल