Bhagwat Karad On Aurangzeb: छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात असलेल्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) काढून टाका अशी मागणी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat)  यांनी गेल्या आठवड्यात केली होती. त्यांच्या याच मागणीचे समर्थन करत आता केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी औरंगजेबाची कबर हैदराबादला हलवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या विधानावरून आता आणखीच राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 


औरंगजेबाची कबर खुलताबाद येथून हलवून हैदराबाद येथे हलवली पाहिजे, असे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले असल्याचा प्रश्न कराड यांना विचारण्यात आला. यावर बोलताना कराड म्हणाले की, संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया मी टीव्हीवर आयकली असून, त्यांचे अभिनंदन करतो. त्यांनी खरच बोलले आहे. औरंगजेबाची कबर ही हैदराबाद हलवा हे खरं असून, त्याचे मी समर्थन करतो. पण लगेचच त्यांनी यु टर्न घेत, शिरसाट यांना असे म्हणायचे होते की, जे खासदार हैदराबादचे आहेत त्यांना येथे रोप आलाय त्यांना आता परत पाठवा. 


जलील यांना बिहारच्या औरंगाबादमध्ये जावे लागणार 


कराड म्हणाले की, माझे मुस्लीम बांधव कधीही औरंगजेबाला सपोर्ट करत नाही. खासदार इम्तियाज जलील फक्त राजकारण करत आहेत. तर जलील आणि नामांतराच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या लोकांच्या घरातील किती लोकांची नावं औरंगजेब आहेत. त्यामुळे मुस्लीम लोकांना औरंगजेबाबद्दल कोणतेही सहानभूती नाही. तर औरंगाबादमध्ये जन्मलो आणि औरंगाबादमध्येच मरणार असे म्हणणाऱ्या जलील यांना यासाठी बिहारच्या औरंगाबादमध्ये जावे लागणार असल्याचे देखील कराड म्हणाले. 


अंबादास दानवेंना प्रत्युत्तर....


नामांतराच्या मुद्यावरून भाजप आणि शिंदे गट राजकारण करत असल्याचा आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना देखील कराड यांनी उत्तर दिले आहे. यावर बोलताना कराड म्हणाले की, यात कोणतेही राजकारण केले जात नाही. आमची सुरवातीपासूनच ही मागणी होती. त्यामुळे दानवे यांचे आरोप चुकीचे असल्याचं कराड म्हणाले. 


काय म्हणाले होते शिरसाट...


नामांतराच्या निर्णयाचा सर्वात जास्त दु:ख हैदराबादींना झाले आहे. त्यामुळे असे लोकं उपोषणाच्या नावाखाली शहराला वेठीस धरण्याचे काम करतायत. औरंगाबाद शहराचे नाव बदलणे म्हणजे अत्याचारी औरंगजेबाविरोधातील हा लढा आहे. तर औरंगजेबाचे तुम्ही काय वंशज आहात का? असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला होता. तसेच औरंगजेबाच्या कबरेचे अवशेष आमच्या येथे नको. त्यामुळे ही कबर काढून घ्यावी अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याची माहिती शिरसाट यांनी दिली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


छत्रपती संभाजीनगरमधील औरंगजेबाची कबर काढा, संजय शिरसाट यांची मागणी