छत्रपती संभाजीनगर : शहरात बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या तीन दिवसीय कार्यक्रमाची बुधवारी सांगता झाली. दरम्यान याच कार्यक्रमात काही मुस्लीम कुटुंबांनी हिंदू धर्मात प्रवेश केला. अहमदनगर येथील जमीर शेख यांच्या कुटुंबातील एकूण 9 सदस्यांनी शास्त्रींच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. तर, छत्रपती संभाजीनगरच्या हिंदू धर्मियांना आणखी 10 लोकांची भेट देऊन जात असल्याचं बागेश्वर धाम यावेळी म्हणाले. तसेच, हे सर्व लोकं आपल्या इच्छेने हिंदू धर्मात दाखल झाले असल्याचे सुद्धा बागेश्वर धाम (Bageshwar Dham) म्हणाले. 


दरम्यान, मुस्लीम असलेल्या जमीर शेख यांनी हिंदू धर्म स्वीकारतांना बागेश्वर धाम यांचे आभार मानले. तर, लहानपणापासून आपण हिंदू रिवाजानुसार पूजापाठ करतो. त्यामुळे  सनातन धर्मावरील श्रद्धेमुळेच आपण धर्मांतर करीत असल्याच्या शेख म्हणाले. एवढंच नाही तर आपल्या दोन्ही मुलींची लग्ने सुद्धा हिंदू धर्मात करून दिल्याचं शेख म्हणाले. बागेश्वर धाम यांचे व्हिडिओ आपण मोबाईलवर पहिले आणि आपल्यातील सनातनी जागा झाला. त्यानंतर बजरंग दलाच्या पदाधिकारी यांच्या मदतीने आपण आज इथे पोहचले असून, पुन्हा हिंदू धर्म स्वीकारले असल्याचे शेख म्हणाले. 


धीरेंद्र शास्त्रींना हृदयाचार्य उपाधी


सकल हिंदु जनजागरण समितीतर्फे धीरेंद्र शास्त्री यांना हिंदु हृदयाचार्य ही उपाधी देत असल्याचे डॉ. भागवत कराड यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी, प. पू. धीरेंद्र महाराज पुढे बोलताना म्हणाले, अंजनीपुत्र पवनसूत हनुमान म्हणजे बलबुद्धी, विद्या, ज्ञान, आठ सिद्धी आणि नवनिधींचे दाता आहेत. त्यांची खंड न पडता सेवा करा, हनुमान चालीसाचे पठण करा. हनुमान तुमचे सगळे संकटांचे निवारण करतील.


देवेंद्र फडणवीसांनी दौरा टाळला...


शहरातील रेल्वे स्टेशन भागातील अयोध्या मैदानात बागेश्वर धाम यांचे दरबार भरले होते. त्यांच्या याच कार्यक्रमाचे बुधवारी सांगता झाली. मात्र, शेवटच्या दिवशी या कार्यक्रमाच्या आरती आणि शुभसंदेशसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. मात्र, ते वेळेअभावी येवू शकले नसल्याचे आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, ज्या संभाजीनगर शहरात बागेश्वर धाम यांचा दरबार भरला आहे, त्याच संभाजीनगरात मराठा आरक्षण उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यामुळे शहरात येणारे फडणवीस जरांगे यांची भेट घेणार अशी सकाळपासून चर्चा होती. मात्र, मराठा समाजाचा फडणवीस यांना होत असलेला विरोध, त्यात ओबीसी-मराठा असा वाद पाहता फडणवीस यांनी संभाजीनगरचा दौरा टाळला असल्याची चर्चा आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


'अंनिस'चे आव्हान फक्त माध्यमांमध्ये चर्चेत येण्यासाठी: धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचे प्रतीआव्हान