छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची आणखी मुदत दिली आहे. दरम्यान, उपोषण सोडल्यावर जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र, असे असतांना देखील सरकारसोबत त्यांची चर्चा सुरूच आहे. यापूर्वी शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन, त्यांना जीआरची कॉपी दिली होती. तर, आज पुन्हा सरकारचे एक शिष्टमंडळ जरांगे यांची भेट घेणार होते. यावेळी या शिष्टमंडळाकडून टाईम बॉन्डबाबतचा अहवाल सादर करण्याची शक्यता होती. मात्र, आता शिष्टमंडळ आज ऐवजी उद्या येण्याची शक्यता आहे. त्यामुळे, जरांगे आणि सरकारच्या शिष्टमंडळाचा आजच्या भेटीचा मुहूर्त हुकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


सरकारला 40 दिवसांची मुदत देऊन देखील आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला नव्हता. त्यामुळे मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यात उपोषण सुरु केले होते. त्यानंतर सरकराचं शिष्टमंडळ आणि माजी न्यायमूर्ती यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आणखी काही दिवसांची मुदत देण्याची मागणी केली. त्यानुसार जरांगे यांनी 24 डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत दिली आहे. यावेळी सरकारच्या वतीने टाईम बॉन्डबाबत देण्याचं देखील ठरले होते. त्यानुसार, हा टाईम बॉन्ड देण्यासाठी आज सरकारचे एक शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला छत्रपती संभाजीनगरमध्ये येणार होते. मात्र, आजचा हा दौरा उद्यावर जाण्याची शक्यता आहे. पण अचानक हा दौरा रद्द का झाला? याबाबत कळू शकले नाही. 


काय आहे टाईम बॉन्डमध्ये? 


मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवण्यासाठी माजी न्यायमूर्ती यांनी मध्यस्थी केली होती. तसेच याचवेळी सरकारचे एक शिष्टमंडळ देखील आंतरवाली गावात आले होते. यावेळी, झालेल्या चर्चेत टाईम बॉन्ड देण्याचं देखील ठरले होते. उपोषण मागे घेतांना आरक्षण कशा पद्धतीने दिले जाईल, यासाठी सरकार काय-काय करणार, आरक्षणाचा आदेश कधी काढला जाईल, तसेच आरक्षण देतांना याच लाभ कुणाला घेता येईल, याची चर्चा झाली होती. मात्र, ही चर्चा टाईम बॉन्डच्या माध्यमातून देण्याची मागणी जरांगे यांनी केली होती आणि सरकराने देखील ते मान्य केले होते. त्यानुसार हा  टाईम बॉन्ड असण्याची शक्यता आहे. 


जरांगे विरुद्ध भुजबळ वाद पेटला...


मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांनी पहिल्यापासून विरोध केला आहे. तर, आता पुन्हा त्यांनी यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नकोच या भूमिकेवर भुजबळ ठाम आहे. तर, भुजबळ यांच्या टीकेला जरांगे यांच्याकडून देखील प्रतिउत्तर दिले जात आहे. आम्ही कोठेही अतिक्रमण करत नसून, आमच्या हक्काचे आरक्षण घेत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. त्यामुळे जरांगे विरुद्ध भुजबळ वाद अधिकच पेटला असल्याचे पाहायला मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे; पाठिंबा दर्शवत बागेश्वर धाम बाबांनी थेट कारणंच सांगितलं